थोडेसे बोलावे असे वाटते तुटलेले जोडावे असे वाटते उगाच येतो अहंकार आडवा मीपण सोडावे असे वाटते. पावसात ओघळावे असे वाटते पुन्हा फुलावे असे वाटते उगाच येतात दिवस वेंधळे मार्ग शोधावे असे वाटते. संवाद साधावा असे वाटते भाव जाणावे असे वाटते एकमेकांमधले अंतर तोडून हात मिळवावे असे वाटते. किती शिल्लक उन्हाळे असे हिवाळे जपावे असे वाटते, संपून गेला बहर तरीही आठवणीत रहावे असे वाटते. ---- अभय बापट