रसग्रहण,मला कधीही न जमलेला एक साहित्यप्रकार. कविता हा खरंतर अत्यंत आवडणारा प्रकार,पण मला साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलेल्या कवीताच जास्त भावतात. क्लिष्ट शब्दांची कलात्मक मांडणी मला कधीच आवडत नाही,कदाचित लोकांनासुद्धा म्हणूनतर आवडत्या कविता सांगा असे म्हटले कि पटकन बहीणाबाई,शांता शेळके,मंगेश पाडगांवकर,कुसुमाग्रज,बोरकर यांच्याच कविता आपोआप तोंडातून बाहेर पडतात. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचे रसग्रहण असावे का,कदाचित मराठी साहित्यातील ते पहिले रसग्रहणही असू शकेल. कवीला शब्दसृष्टीचा ईश्वर म्हटले जाते त्यांने निर्माण केलेले एक-एक काव्य मला त्या अनोख्या निसर्गातील झाडावर लगडलेले फळच वाटते,स्वत:च्या हाताने वेचून काढावे,मनमुराद रस चाखावा,त्या काव्यातील शब्दांच्या खेळाचा गोडवा तोंडात घोळवत ठेवावा. रसग्रहण हे मला कोणीतरी तयार करून दिलेला रस वाटतो.ग्रेस यांच्या एकेका कवितेचे किती विभिन्न अर्थ काढले जातात हे पाहिले की मलातरी एकच वाटते कविता आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा मगच त्या कवीतेचे रसग्रहव वाचावे. शांता शेळके यांच्या सहजखूण कविते...