सकाळी सकाळी नजरेला समृद्ध करणारा प्राजक्त पायदळी तुडवला गेला की दिवसभर दूर राहूनही सोबत करतो तो चाफाच.
हिरवळीवर कितीही गार वाटले तरी शितल अनुभूती मिळते ती घरातल्या उबदार सावलीतच.
निवडणूकीच्या वेळेला वाडगाभर मटणाचा रस्सा फुकटचा चापायला मिळालातरी खरी तृप्ती मिळते ती घरातल्या साध्या जेवणानेच.
सोशलसाईट्सच्या कोळ्याच्या जाळ्यात वाऱ्यांवर झुलले तरी तरी मानसिक संतुष्टी मिळते आपल्या मठीत आणि आपल्यांच्या मिठीतच.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment