Skip to main content

स्वगत बोकोबांचे

खावं काही पळवून पातेलीतलं की रहावं उपाशी हा एकच सवाल आहे. ह्या घराच्या वळचणीला उरलेला पोळीचा तुकडा खावून जगाव बेशरम लाचार आनंदान ?
की थैमान घालावं म्याव म्याव करुन स्वत:च्या हक्कासाठी 
आणि करावा शेवट या लादलेल्या उपासाचा.
माझ्या तुझ्या ह्याच्या अन त्याच्याही.
पोटात चुकचुकणाऱ्या उंदाराने भुकेला असा डंख मारावा…
की नंतर मिळणाऱ्या सुखनिद्रेला नसावा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? गळ्यात बांधलेल्या घंटेचे तर…तर…
इथेच मेख आहे.भुकेच्या भयंकर डोहात अपेक्षेने तोंड घालण्याचा 
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो रात्रीची निरव शांतता आसमंतात हात पसरुन काळोखाला आपल्या कवेत घेण्याची.
सहन करतो लबाड साधूसारखे डोळे मिटून वाट बघण्याची तपश्चर्या आमच्या अमाप उत्साहाला कुंपण पडत असले तरी...

अखेर तोंडाचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच दादाच्या पायाशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला आधार दिला ते ही आम्हाला वाट पहायला लावतात छोट्या ताईच्या शाळेतून येण्याची.

आम्ही कोणाच्या पायावर अंग घासायचं, लाडात येवून? कोणाच्या पायाशी गुरगुरत बसायचं अपेक्षेने?
कोणाच्या ? कोणाच्या???

बोके सम्राट

---अभय बापट 
२२/०७/२०२५

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४