दलित पँथरच्या उगमाचा धुरळा खाली बसून जमाना उलटून गेला तरी महाराष्ट्रात पँथरच्या जन्माचे पिक फोफवण्याचे थांबतच नाही आहे,अगदी काँग्रेस गवताप्रमाणे.
अशोक जैन यांच्या डोक्यातून "ललित पँथरचा" जन्म झाला त्यालाही काळ लोटला.
सोशल साईट्सवर "गळित पँथरचे" पिक दरवर्षी नेमाने घेतले जातेच आहे.
जैन यांच्या ललित पँथर मध्ये दोन गट होते एक यशस्वी साहित्याला झोडणारा तर दुसरा सत्यकथेचा द्वेष करणारा.
गळित पँथरमध्ये तीन गट असतात, एक समंजस माणसांचा गट,द्वेष सुरवातीला ठीक आहे नंतर मात्र वेगळा मार्ग चोखळवा असे मानणारा.
दुसरा द्वेष हाच आपला पाया आहे तो भक्कम ठेवत प्रस्थापितांना झोडणारे.
आणि तिसरा दोन्हीमध्ये समतोल साधत याचे पण बरोबर त्याचे पण बरोबर बोलत आपला स्वत:चा पाया भक्कम करणारा.
गळित पँथर मध्ये काहीजण असे असतात ज्यांची बोळवण सर्वसामान्य माणसं "चहापेक्षा किटली गरम" या एका वाक्यात करतात.
प्रस्थापितांमध्ये नेते अनेकांना दुखावण्याचा यज्ञ अव्यहायतपणे पार पाडत असतात पण या पँथर्समध्ये काहीजणांचे एकमेव ध्येय असते ते म्हणजे या संघटनेचे संचालकपद काही झाले तरी मिळवायचेच,त्यासाठी आपल्या जून्या मित्रांना तोडताना त्यांना काही दु:ख होत नाही.हेच खरे धोकादायक असतात,हेच संघटनेत कलह माजवतात आणि आपली भाकरी भाजून घेतात.
गळीत पँथर्सच्या समोर उदाहरण असते ते प्रस्थापितांचेच, त्यांचे सर्व गुण-दोष हे घेवून येतात,जरासे मनाविरुद्ध कोणी बोलले की त्याला कबुतर,खबऱ्या,चमचा असे हिणवत बसतात.
अशी भुसभुशीत झालेल्या जमीनीत आशेचे अंकुर पटकन रुजतात आणि नाराजांच्या या भुमित नवीन संघटनेची जुळवाजुळव सुरु.
गळीत पँथर्सचे पिक पुन्हा नव्या हंगामात तरारुन वर येते.
Comments
Post a Comment