Skip to main content

आवरणे

चंबूगबाळ आवरावं म्हणतो 
माणसांंना विसारावं म्हणतो
सावरणाऱ्या पुस्तकांंना
समर्थ हाती सोपवावं म्हणतो.

थोडसं झुकावं म्हणतो
ओझ उतरावं म्हणतो
आपुलकीच्या धाग्यांंना
निगुतीने सोडवावं म्हणतो.

स्वप्न सोडावं म्हणतो
रस्ता बदलावा म्हणतो
शेवटच्या मार्गावर
एकट्याने चालावं म्हणतो.

आठवणीतल्या शब्दांना
आतातरी जागावं म्हणतो,
पुस्तकातल्या गोष्टींमधलं
जग बघावं म्हणतो.

कोणजाणे कसा असेल
खडतर मार्ग काळोखाचा
उजेडासाठी एकट्याने
एकटंच जळावं म्हणतो.

सोप्पं नसतं बोलण्याइतकं
वागणं जगावेगळं
संपण्यापूर्वी पुन्हा एकदा
नव्याने तेवावं म्हणतो.

शब्दांनी जोडावं म्हणतो
मार्दव्यानं वागावं म्हणतो,
मराठी बाणा सोडून
माणसासारखं जगावं म्हणतो

----अभय बापट
२५/०४/२०२३






Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४