मने,
आठवतय तुला दोन वर्षांपूर्वी तू मला अनफ्रेंड केलेस तेव्हा मी विचारले होते,"एवढी काय गरज होती अनफ्रेंड करण्याची ?
तेव्ही तू नेहमी सारखेच खुप मोठे लेक्चर ऐकवले होतेस,डिस्कनेक्ट होणे काय, मन:स्वास्थ काय किती अवघड शब्दात सांगायचा प्रयत्न केला होतास. मला अजिबात समजले नव्हते कारण मला ते समजून घ्यायचेच नव्हते,जी गोष्ट मनालाच पटली नाही ती का समजून घ्यायची.
पण सर्व अवघड गोष्टी सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या, गुरुंचाही गुरु असलेल्या निसर्गाने गेल्या दोन वर्षात हे सुद्धा समजावून दिले.
मने, आपण प्रेमाने बागेत लावलेली,गुलबक्षी, सदाफुली, लाजाळू जेव्हा बागेतल्या बाकीच्या झाडांना गराडा घालून नष्ट करु पाहतात तेव्हा त्यांच्यावर कात्री चालवावीच लागते.
मने,सावरता येत नसेल तर आवर घालावा लागतोच हेच तेव्हा तू सांगत होतील.
पण तरीही मने डिस्कनेक्ट होणे आणि तोडून टाकणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे नाही का समजले तुला.
मने, आई आपल्या आपल्या अपत्यासोबत नाळ तोडून टाकते ते डीस्कनेट होणे, ती डिस्कनेक्ट झाली तरी आपल्या अमृताचा वर्षाव नाही थांबवत, बाळाच्या विकासासाठी ती डिस्कनेक्ट करते तोडून नाही टाकत.
मने, स्वत:ला टोचणारा काटा स्वत:च्या आनंदासाठी काढून टाकणे, हे तोडून टाकणे, स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्याच्या दु:खाचा विचार न करणे हे डिस्कनेक्ट होणे नव्हे ते तर तोडून टाकणे.
मने, आता मीही शिकलोय, तोडून टाकायला नव्हे सर्व झाडांच्या निकोप वाढीसाठी त्यांना सावरताना स्वत:च्या मनाला आवरायलाही.
मने, शेवटी तुझ्यासारखा शिकलासवरलेला नाही तर एक साधा शेतकरी आहे.जूनं जपताना नवीन जोडायला आवडतं मला आणि काटे जमा करुन त्यांचा कुंपणासाठी वापर करायला सुद्धा.टोचणारे काटेसुद्धा आपणच जपलेले असतात कधीतरी, आपल्या हौशीसाठीच.
Comments
Post a Comment