मराठी माणसाच्या मनामनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
मराठी मुलुखाच्या समृद्धीसाठी,सन्मानासाठी महाराजांना आयुष्यभर लढा द्यावा लागला. परकीयांशी आणि स्वकीयांशीसुद्धा.
हा लढा स्वराज्य स्थापने नंतर तरी थांबेल असे वाटले होते पण तो अविरत चालू आहे.
व्हिक्टोरीया टर्मिनसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नामकरणासाठी सुद्धा १९९६ पर्यंत वाट बघावी लागली. नशीबाने तेव्हा मराठी लोकांच्या मागणीचा न्याय देणारे समंजस, सद्हृदयी अटलबिहारी वाजपेयी देशाच्या पंतप्रधानपदी होते.
सहार विमानतळाचे नामकरण असो किंवा सहार विमानतळावर पुतळ्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागले. विमानतळ विस्तारीकरणाच्या वेळी महाराज्यांचा पुतळा गोडावून शेजारी उन्हातान्हात उभा केला गेला. त्यावर सावलीसाठी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा आंदोलन. नावात महाराज शब्द वापरण्यासाठी आंदोलन.
महाराजांनी ज्याच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य खर्ची घातले, ज्या औरंगजेबाने महाराज्यांचे स्वराज्य बुडवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करुन त्यांची हत्या केली त्या औरंगजेबाच्या नावाचे शहर असावे व त्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी सतत अमान्य व्हावी हे दुर्दैव.
आज जी लोक आग्र्यातील संग्रहालयाच्या नामकरणाने आनंदोत्सव साजरा करतायत त्यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी मदत करावी.
महाराजांचे किल्ले त्यांच्याच मुलखात बेवारस एकाकी पडले आहेत. गो.नी.दांडेकर आपल्या दुर्गभ्रमणगाथेत लिहीतात,किल्ल्यावरच्या पितळी/पंचधातूच्या तोफांचा निव्वळ त्या गडगडत खाली जातांना येणारा आवाज ऐकण्यासाठी कडेलोट केल्या गेल्या.
सर्वांत लबाडपणाचा कळस म्हणजे महाराजांच्या राज्यात, जिथे त्यांनी कर्तृत्व गाजवले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या महाराष्ट्रात छत्रपती हे "साडेतीन जिल्हाचे राजे" म्हणून लहान-लहान मुलांना करुन दिली जाणारी ओळख.
बी मधून उगवणाऱ्या इवल्याश्या रोपाचेच पुढे जावून विशाल वटवृक्षात रुपांतर होते हे न जाणणारी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली हेच महाराजांचे, महाराष्ट्राचे, महाराजांवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाचे दुर्दैव.
Comments
Post a Comment