Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

हे सारस्वतांनो

प्रतिभावंत जनांनो जमू इथेच आता झाडावरच्या कळ्यांनो उमलू इथेच आता. साहित्य सुमनांचे वेचू सुगंध थोडे  आपले बोल बोबडे बोलू इथेच आता. नक्षत्रांची पायवाट उजळली त्यांनीच आहे त्या वाटेवरुन आपणही चालू इथेच आता. कल्पकता आणि कलांचा घेवून वारसा हा आनंद कणाकणांनी उधळू इथेच आता. ते कण अमृताचे देवून ज्ञानवंत गेले ते क्षण भाग्यवंत वेचू इथेच आता. ---अभय बापट २४/०५/२०२३

बंधन

उंची गाठण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न केले पायच माझे त्यांनी तेव्हा छाटून टाकले. नव्हते स्वप्न माझेही कोणतेही जगावेगळे जातीत जगाला त्यांनी तेव्हा वाटून टाकले. पोटासाठी घेतली मी तरीही भरारी वगैरे राशीतले दाणे त्यांनी तेव्हा झाकून टाकले. ठेवली होती थोडी हिरवळ आठवणींची  आठवणीने त्यांनी तेव्हा पाणी तोडून टाकले. साधे सोपे नाही राहीले जगणे आता आधीच त्यांनी तेव्हा कळीला खुडून टाकले. --- अभय बापट २४/०५/२०२३

आई

नदी सारखी प्रत्येक वळणावर नव्याने भेटत असते आई. वाहता वाहता कणाकणाला समृद्ध करत असते आई. नात्याच्या प्रत्येक रंगाला नवी ओळख देत असते आई. रंगांवाचूनही आयुष्यामध्ये रंग भरत असते आई. ----अभय बापट मदर्स डे १४/०५/२०२३

तुझ्या नंतर

नेहमीच काही नवे लिहावे सुचल्यानंतर नेहमीच कसे नवे सुचावे तू नसल्यानंतर, काही भावना, काही वेदना अक्षय असती नेहमीच कसे मन मारावे तू दिसल्यानंतर. पुन्हा पुन्हा घोळत राहतात शब्द वेंधळे कसे रुसावे आयुष्यावर तू, स्मरल्यानंतर. नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर सांग कितीदा किती लिहावे तू भेटल्यानंतर. तुझ्या रंगात रंगून गेले आयुष्य सारे सांग कसे ते रंग उतरावे तू गेल्यानंतर. प्रथमच लिहीली अशी कविता तुझ्यासाठी मिळेल का अभय सांग तू, वाचल्यानंतर. ---- अभय बापट १२/०५/२०२३

जगणे राहून गेले

सगळे बोललो तरी बोलणे राहून गेले श्वासामधून सुगंधाचे देणे राहून गेले. किती चाललो एकमेकांच्या सोबतीने हातामध्ये हात आपले घेणे राहून गेले. रचले इमले कितादा स्वप्नातल्या गावातले विश्वासाचे धागे तरीही गुंफणे राहून गेले. अनुभवले जागूनी चांदण्याचे सोहळे ओंजळीत चांदणे ते भरणे राहून गेले. आले सुख उशाशी रातराणीच्या पावलांनी रात्रीपाठी नव्या दिसाला जागणे राहून गेले. -----अभय बापट ०२/०३/२०२३

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे तर उमटली सारी सोनपावले तुझ्यामुळे या आयुष्यात वसंत फुलला. ----अभय बापट ०२/०५/२०२३