सगळे बोललो तरी बोलणे राहून गेले
श्वासामधून सुगंधाचे देणे राहून गेले.
किती चाललो एकमेकांच्या सोबतीने
हातामध्ये हात आपले घेणे राहून गेले.
रचले इमले कितादा स्वप्नातल्या गावातले
विश्वासाचे धागे तरीही गुंफणे राहून गेले.
अनुभवले जागूनी चांदण्याचे सोहळे
ओंजळीत चांदणे ते भरणे राहून गेले.
आले सुख उशाशी रातराणीच्या पावलांनी
रात्रीपाठी नव्या दिसाला जागणे राहून गेले.
-----अभय बापट
०२/०३/२०२३
Comments
Post a Comment