Skip to main content

Posts

Showing posts from May, 2025

कधीतरी वाटते

कधीतरी वाटते  ओसाड तळ्याकाठी  उतरावा एक पक्षी, त्याच्या नाचऱ्या पावलांनी मातीत उमटावी नक्षी. कधीतरी वाटते  तापल्या भुईवर हलकीशी यावी सर, निष्पर्ण मातीतून फुलून उठावा बहर. कधीतरी वाटते  मोकळ्या अंगणात रासलीला रंगून जावी सावळ्या कृष्णासाठी राधाही धावून यावी. कधीतरी वाटते  धारानृत्य रंगावे आभाळाच्या पटावर धरेलाही फुटून पान्हा अमृताने यावे वर. कधीतरी वाटते  अभ्र सारे सरावे प्रगटावा अनाहत नाद चैतन्याच्या चांद राती अज्ञातातून यावी साद. -----अभय बापट २०/०५/२०२५

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

भुल

नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर सांग मी किती लिहावे तू भेटल्यानंतर. अमृतानी भरुन जाते खळी तुझी ती सांग मी किती भूलावे तू हसल्यानंतर. तुझी ओढ,तुझी आर्जवे,प्रीती तुझी ती सांग मी कसे जगावे तू रुसल्यानंतर. तुझ्या ओठांवर, तुझ्या बटांवर, सांग मी किती लिहावे तू दिसल्यानंतर. नाक चाफेकळी आणि मोत्यांची झळाळी सांग मी कसे विसरावे तू गेल्यानंतर. ------ अभय बापट

गंध आठवणींचा

तू श्वास होऊन ये आठवणींच्या सोबतीला गंध तुझा मोगऱ्याचा मनामध्ये जपलेला. उब तू घेवून ये शब्दांमधली भावनांची गारवा तू दिलेला डोईवर आहे थांबलेला ही रात्र मंतरलेली दे हातामध्ये हात पुन्हा तुझ्यासाठी स्वप्नांचा खेळ हा मांडलेला. तुझ्या स्मितहास्य झरझर पावसासारखे मनामध्ये नव्याने आशेचा अंकुर रुजलेला. तुझ्या नजरेतील स्निग्धता आहे अजून जवळ कालच्यासारखा आजही तो क्षण हृदयात जपलेला. तुझ्या शिवाय अपूर्ण सारं, तुझ्यात आहे पूर्णत्व म्हणूनच कोणी अजूनही त्या वळणार थांबलेला. ---- अभय बापट ०२/०५/२०२५

एकशे अकरावी दुरुस्ती--ओळख पुस्तकांची

एकशे अकरावी दुरुस्ती... सुरेश द्वादशीवार या एका गांधीवादी पत्रकाराने लिहीलेली एक कादंबरी.  काही मुठभर लोकांच्या अमर्याद सत्तेच्या, अमर्याद अधिकाराच्या लालसेपोटी एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा घाट घातला जातो. त्याला लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून लोकांना असुरक्षित वाटावे अशा अफवा पसरवल्या जातात, खून, हत्या, अपघात घडवले जातात. एक लष्करी वैमानिक, देशभरातील माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण करणाऱ्या सरकारी खात्यातील एक अधिकारी, एक हुशार, लोकप्रिय पत्रकार यांच्या लक्षात नेहमीपेक्षा वेगळ्या घडणाऱ्या गोष्टी लक्षात येतात. ती पत्रकार या सर्व गोष्टींची माहीती विवेकी,देशभक्त, लोकशाही प्रेमी गृहराज्यमंत्र्यांना देते. गृहराज्यमंत्री हे सर्व सरन्यायाधीशांना सांगतात, सरन्यायाधीश सर्व घटनांची माहीती राष्ट्रपतींना देतात आणि विधेयक सरकरकडे परत विचारासाठी पाठवण्याची विनंती करतात आणि..... मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या सरन्यायाधीशांचा भिषण अपघात होतो. मृत्यूपूर्व जबाबात न्यायाधीश सुरवातीलाच म्हणतात," माझा मृत्यू अपघाती नाही तर एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा मी पहिला बळी आहे." गृहराज्यमंत्र्यांचा उ...