नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६
तू निळ्या नभाचा राजा मी निष्पर्ण धरेची राणी तुझ्या माझ्या सोबतीचा करार लिहिला कोणी. कोणी लिहिली माथी सटवाईची अदृष्य लिपी नकळत जोडून जातात ही जन्मभराची नाती. ही ओढ कुठूनी येते अलवार रंग गंधाची पटवून ओळख देते खूण जन्म जन्माची. पैलतीरावरुन येतो पाव्याचा नाजूक सूर पुन्हा पावले माझी जातात निघून दूर तू कृष्ण होतास तेव्हा मीच होते का रे राधा नावाविना नात्याची का मलाच होते बाधा. -----अभय बापट २९/०३/२०२६