शिवरायांचा आठवावा प्रताप....
शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.
शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली.
पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.
मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.
शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.
पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, किती मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागले हे त्यांचे परिस्थितीशी सलगी देणे हेच
पुढे जावून बनलेल्या मराठी साम्राज्याचे,हिंदवी स्वराज्याचे
गमक आहे,
प्रतापाच्या गाथा लिहील्या जातातच, त्या तशा जायलाच हव्यात कारण त्याच आपल्याला दुर्दम्य आशावाद देत असतात, पण त्यांच्या गुणांचा अभ्यास,पाठराखण, आचरण आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
----अभय बापट
१९/०२/२०२६
Comments
Post a Comment