माझा आवडता लेखक.....
खरंच असा एकच एक लेखक येईल सांगता. वाचनाची सुरवात झाली ती चांदोबा आणि अमृतच्या आजोबांनी जपलेल्या अंकांपासून. गाडी पुढे सरकत जादूचे दिवे,उडत्या चटया हे स्टॉप घेत भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज, खजिन्याची बेटं असा खडतर मार्ग शोधत होती. शाळेतल्या बाई या सोबतच विज्ञान,इतिहास असे वेगवेगळे नवलाईचे प्रदेश दाखवत होत्या.
कधीतरी सुशींच खजिना आणि मंत्रजागर ही पुस्तकं हाती लागली आणि सुशी नावाच्या बेटावर असंख्य दिवस नवलाईची इंद्रधनुष्य अनुभवली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,द.मा.मिरासदार, द.पा.खांबेटे हे झुळझुळणारे झरे तहान भागवत होतेच.
छोट्या गावातल्या छोट्या वाचनालयामुळे एकाच ठिकाणी अडकून राहणे शक्यच नव्हते. श्रिकांत सिनकर, बा.सि.अष्टिकर, व.कृ.जोशी हे गुन्हेगारीचे जग हाताला धरुन दाखवत होते तेव्हाच प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईतील झगमगाट आणि दिवसाच्या झगमगीत मुंबईतील काळाकुट्ट अंधार अधोरेखीत करत होते.
व्यंकेटेश माडगुळकर परवचा,सरवाच्या माध्यमातून साधंसुधं गाव,निसर्ग,जगणं दाखवत असतानाच. मारुती चितमपल्ली जंगलचे देण भरभरुन ओंजळीत देत होते,देत असतात.
निरंजन घाटे तर आवडते लेखक जणू ज्ञान आणि विज्ञानाची पाणपोई उघडून बसलेले तृषार्तांना तृप्त करणारे लेखक. दुर्गा भागवत आपल्या संस्कृतीतील संचित समोर उघड करत होत्या. विजय देवधर,बाळ भागवत, रविंद्र गुर्जर, लालू दुर्वे इंग्रजीतील वाङ्मय मराठीत आणून ते वेगळ जग आणि वेगळे अनुभव देतच असतात. अच्युत गोडबोलेंसारखे लेखक एकाच विषयाची समग्र माहीती देवून मराठी समृद्ध करतात.
या प्रवासात असंख्य पाऊलवाटा भेटल्या कमुदिनी रांगणेकरांनी रुपांतरीत पुस्तके, कुसूम अभ्यंकर,सुमती क्षेत्रमाडे सारख्या कौटुंबिक कथा लेखिका.रविंद्र पिंगेंसारखे व्यक्तीचित्रणं,स्थळवर्णंन लिहीणारे. मिनी प्रभू, पुलं,गंगाधर गाडगिळ,रमेश मंत्री, सुभाष भेंडे, यांची प्रवासवर्णने.
रमेश मंत्रींचा जनू बांडे, गंगाधर गाडगिळांचे बंडू-स्नेहलाता.
कणेकरांची कणेकरी शैली. अनिल अवचटांचे वेगवेगळे अनुभव,पुभांची प्रथम पुरुषी ऐकवचनी तेजस्वी देश आणि धर्मभक्ती. अत्र्यांनी पाजलेले कऱ्हेचे पाणी, त्यांचा हजरजबाबी विनोद, बोचकारणारी भाषण.
एकवेळ कसर पुस्तकांचा फडशा पाडायला विसरेल एवढ वाचलं गेलयं, कधीकधी पुस्तकं धुंढाळताना चकवा ही मिळाला आणि एखादं वेगळचं जग समोर उभं करणारे लेखकही भेटले.
यासर्वांनी जो आनंद दिला तो शब्दात मांडताच येणार नाही.
एकाचेच नावं घ्यायचे तर ते कोणाचे हे कधीही न सुटणारे गणितच.
सध्या काय वाचतोय-
प्रारंभ- गंगाधर गाडगीळ.... हा कथा आहे मुंबईच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका पार पाडणारे जगन्नाथ शंकरशेट यांची तेवढीच ही कथा नव्या युगाकडे वाटचाल करणार्या मुंबईच्या प्रारंभाची.
Comments
Post a Comment