झाडासम जगलो मी
फुललो कधीच नाही,
बदलले ऋतू कितीही
बहरलो कधीच नाही.
आकाश झुंबराचे
आणि आरसा बिलोरी,
निरखून बघण्यास
झुकलो कधीच नाही.
नक्षी पाखरांनी
नभात मांडलेली,
बघितली मी तरीही
झुललो कधीच नाही.
आभाळ पांघरोनी
मी घेतले सदाचे,
होते समीप सारे
रुजलो कधीच नाही.
त्या माणसांनी कधीचे
घातले हजारो घाव,
होतो एकटा जरीही
तुटलो कधीच नाही.
गेले विरुन सारे
आसमंतातील तारे,
स्थानावरून तरीही
ढळलो कधीच नाही.
येतील असेच वारे
आणि वादळे कधीही,
झेलूनही वार सारे
रडलो कधीच नाही.
----अभय बापट
१४/१२/२०२२
Comments
Post a Comment