माणसाच्या दु:खाला नाही पारावार हल्ली
बोकडाच्या मरणाला असतो का वार हल्ली.
पावसाने मांडलाय अनाचार सारा
माणसाने आरंभला आहे ऋतू संहार हल्ली.
देव भेटतो देवळात म्हणतात सारे
देवळाला ही कळतो व्यवहार हल्ली.
मांडतात आजकाल मरणाचे सोहळे
मनामध्ये जपून द्वेषाचा अंगार हल्ली.
कसे जगावे माणसाने सांग आता
उजेडाच्याच पायतळी अंधार हल्ली.
देतोस रोज नव्याने सोनसळी स्पर्श तुझा
पालवीनीच सोडला आहे धीर हल्ली.
काय सांगू स्वप्नातल्या चांदण्या तुला
तूच तू जगण्याचा आधार हल्ली.
त्या सुगंधी भावनांना कोठून आणू
फक्त तुझ्याच पाशी कस्तुरीचे कोठार हल्ली.
-----अभय बापट
१६/०४/२०२४
Comments
Post a Comment