..पावसाळा सुरु झाला,बरसला,विसावलाही पण "कवींच्या नजरेतून पाऊस" हा मेसेज नेमाने बरसतो आहे आणि अजून तीन महिने तो तसाच बरसत राहील. तो मेसेज वाचल्यावर मनात नेहमीच वाटले आपल्यालाही असे काहीतरी सुचत का नाही ? पण ते तर देवाचे वरदान,आपण कसे पेलवू शकणार आपल्या फाटक्या झोळीत ते वरदान.
म्हणून मग आपल्या दुबळ्या ओंजळीत पकडले त्या सरींमधले काही थेंब आणि अर्पण केले अर्ध्य त्या शब्दांच्या ईश्वराला.
सर सर सर सर धावूनी आला
भुमीमध्ये जिरला पाऊस,
हिरवे हिरवे गार गालीचे
शाल लेवूनी निजला पाऊस.
अवखळपणे बरसत आला
वृक्षांच्या कुशीत शिरला पाऊस,
थकून भागूनी धरणीमध्ये
मग विसावला अलगद पाऊस.
तडतड करीत आला पाऊस
नटल्या सृष्टीत रमला पाऊस,
नवजीवन निरखून इथले
मनात हरखून गेला पाऊस.
अधीरपणे आला पाऊस
सृष्टीचाच झाला पाऊस,
अबोल प्रीतीचे दान देवूनी
हळूच निघून गेला पाऊस.
कवीतेमध्ये दिसला पाऊस
शब्दांनी तो सजला पाऊस,
दान देवूनी प्रत्येकाला
मनामनात वसला पाऊस.
Comments
Post a Comment