जाणीवपूर्वक आपल्या समाजात जोपासल्या गेलेल्या वैज्ञानिक अंधश्रद्धा.
अमेरिकेसारखे देश कधीच कुणाचे नसतात , " कापल्या करंगळीवर मुतणार नाही ", असे वर्णन जे कोकणात सर्रास केले जाते ते अमेरिकेसाठी चपखल बसते.
याच अमेरिकेने कधीकाळी कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग सहाय्याने चीन मधील परंपरागत धान्य उत्पादन आणि पशुपक्षी पालनाची काशी करुन आयातीची वेळ आणली होती. चीन त्या अनुभवातून शिकला पण भारतीय "मोडू पण वाकणार नाही" या राष्ट्रीय ब्रीदामुळे कधीच चुकांवरून शिकायला तयार नसतात.
खरं म्हणजे आपल्यासाठीही अमेरिकेचे-पाश्चात्यांचे खेळ नवीन नाहीत, तेथील संशोधक सरकारच्या धोरणांना सोयिस्कर ठरतील असेच निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत.
भारतात पुर्वीपासून वापरले जाणारे शेंगदाणा- तिळाचे तेल अपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भरवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा करण्यात आला, हृदयासाठी धोकादायक असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले गेलेले पाम तेल आणि सोयाबीन तेल इथे रुजवण्यात आले. आत्ताच पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली ही खरे तर संधी होती आपली पारंपरिक खाद्यतेलांकडे लोकांना वळवण्याची पण आयुर्वेदाचे प्रचारक, आयुर्वेदिक औषधांचे निर्माते, योगगुरुंनी पाम तेल निर्मीतीमध्ये उडी मारली.
तीच गोष्ट खोबरेल तेलाची. शेकडो वर्ष भारतात खोबरेल तेल आहार वापरले जात होते-आहे.
१९९० च्या आसपास " अमेरिकन हार्ट असोसिएशन ने" एक अहवाल प्रसिद्ध केला आणि खोबरेल तेलाच्या सेवनाने हार्ट ॲटॅक येवू शकते असा निष्कर्ष त्यात दिला. झाले भारतातील खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आणि करडई आणि सोयाबीन या परदेशी तेलांचा वापर वाढला. अमेरिकेत तयार झालेल्या तेलाला आशियाई मार्केट मिळवण्यासाठी हा कट केला असेल का ?
पुढे त्याच अमेरिकेतील डॉ. ब्रूस फाईप यांनी अभ्यासपूर्वक" द कोकोनट ऑईल मिरॅकल" हे पुस्तक लिहीले. त्या पुस्तकाने प्रभावीत होवून डॉ. मेरी न्यूपोर्ट यांनी अल्झायमर आणि इतर रोगात खोबरेल तेलाचा वापर केला. त्यांनी जे या तेलाच्या उपयोगाबद्दल लिहीले ते" फॉरवर्डेड मेनी टाईम" हा बुक्का कपाळावर लावून आपल्यासमोर पोहचले तेव्हा आपण आपल्याच पुर्वजांच्या आहारातील या तेलाकडे कुतूहलाने आणि विश्वासाने पाहू लागलो.
आयुर्वेदाने पुर्णांन्न म्हणून गौरवलेले गाई-म्हशीचे दुध कसे माणसांसाठी अयोग्य आहे हे सांगणारे संशोधन अमेरिकेतूनच भारतात आले आणि कृषीप्रधान, आयुर्वेदाच्या जन्मभूमी भारताच्या मंत्र्यांनी त्याचा प्रसार करत सोया दूध भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला.
दुधाला दूर लोटत आपण फूड सप्लिमेंट आणि बेबी फुडच्या मागे धावत सुटलोय, यामध्ये कोणत्या कंपन्या आज आघाडीवर आहेत ?
पिढ्यानपिढ्या नवजात बालकांना तेल मालिश, काजळ,तिट लावणे, धुप देणे याला पाश्चात्य वैद्यकशास्त्र विरोध करते, याबाबत आपले डॉक्टर तर अतिरेकी कट्टरता दाखवतात. आज बेबी केअर प्रॉडक्टच्या उत्पादनात कोणत्या कंपन्या आघाडीवर आहेत ?,
अशीच असंख्य उदाहरणे सापडतील,असेच जर होत राहील तर भारतात नेहमी वापरल्या जाणाऱ्या कितीतरी पदार्थांचे उत्पादन भारतातून एकतर बंद होईल किंवा ते अनावश्यक गोष्टींसाठी वापरले जाईल आणि आपल्याला ते पदार्थ अमेरिकेकडून आयात करावे लागतील,जे चिनमध्ये घडले होते.
भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ताब्यात ठेवण्यासाठी अमेरीकेसारखा विकसित देश कोणत्याही थराला जावू शकतो आणि सुशिक्षित भारतीयात बुद्धीभ्रंश निर्माण करण्यासाठी तिथले संशोधक कोणतेही भ्रमित करणारे निष्कर्ष समोर मांडू शकतात.
Comments
Post a Comment