ए ऐक ना !
तुला आधीच सांगितले होते,तुझा पराजय अटळ आहे.
तुला इथे स्वातंत्र्य असते ते त्यांनी ठरवून दिलेल्या परिघातच. कधीतरी हा लहान मोठा होतो पण परिघातच भरारी घेणं हे अटळ प्राक्तन आहे तुझे.
कधी हा परिघ उंबऱ्याच्या आत असतो तर कधी थोडाफार मोठा पण असीम,अथांग कधीच नसतो.
तुझ्या जोडीदाराच्या स्वप्नाची झेप जेवढी उत्तुंग असले तेवढेच जास्त आकाश तुझ्यासाठी खुले असेल,त्याच्या उंच भरारीत त्याला सावरायला, सांभाळायला कोणीतरी सोबत हवे म्हणूनच.
संस्कारांच्या पाऊलखुणांच्या आतच शोधावे लागेल तुला आत्मसन्मान, त्याच्या बाहेर गेलीस, अगदी शब्दांनी सुद्धा तर पावलोपावली तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल.
असे निसरडे रस्ते या आधी अनेकांनी पायी तुडवले तेव्हाच तेथे वहिवाट चालू झाली जर कोणीच या रस्त्यांवरुन चालले नाही तर अविचारांचे शेवाळ त्यांना आणखीन निसरडा करणार,तू ठामपणे चालत राहिलीस तर उद्या अनेकजणी तुला समजून घेणाऱ्या विश्वासाने चालतील तूझ्यापाठून नवीन प्रशस्त रस्ता बनवण्यासाठी, तुझ्या आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढ्यांसाठी.
१४/०७/२०२१
Comments
Post a Comment