Skip to main content

Posts

Showing posts from December, 2025

त्रिदल

ग्रीष्म वनातील...मनातील.   (१) तापल्या भूमीच्या कडेवर ऊन ग्रीष्माचे थरथरते, बघून खेळ ढगांचा गालात हळूच हसते. तापल्या तळ्याकाठी निवांत बसतो काळ, पक्षांच्या पंखाखाली सावली शोधते आभाळ. कोकीळेच्या तालावर आम्रवृक्ष करतो नर्तन,  मृगजळाच्या मागून संध्याछायेचे आगमन. (२) आता होते असे कधी सापडले मुठीत काही क्षण, आणि उसवते ठायी ठायी अबोध अजाण माझे मन. किती जपावी लागते आता नात्यामधली आपल्या वीण, चुकलेल्या एका क्षणाने फाटते तुटते माझे मन. ओंजळा राहते पुरी रिकामी किती टाळावे लागते रण, सुगंधाच्या क्षणाक्षणाला आतूर उत्सुक माझे मन. कधी टळेल हा ग्रीष्म कधी फुलेल पुन्हा बन, तुझ्या प्रीतीच्या वाटेवर तृषार्त सावळे माझे मन. (३)  कसे जपावे अंतरी पिकल्या पानाचे भान, कसे राखावे अंतर मनी भृंगाचे गुंजन. देवा असे का मांडतो ऋतु भरले हे सण, चातकासम आतूर रुपगंधीत माझे मन. कसे थांबवू ओघळणं वेळेच्या ओंजळीतून, कसे सोसावे मौन उसळते अंतरातून. देवा तुझ्या इच्छेने उलगडती सारे क्षण, जपता जपता उमजले हरवणेही एक जतन. कसे मोजावे श्वास ऋतू बदलत्या क्षणी, कसे सोसावे तुटणे स्वप्न जपलेले मनी. शिकवीत जातो काळ सोडून देण...

ग्रीष्म मनातील

कसे जपावे अंतरी पिकल्या पानाचे भान, कसे राखावे अंतर मनी भृंगाचे गुंजन. देवा असे का मांडतो ऋतु भरले हे सण, चातकासम आतूर रुपगंधीत माझे मन. कसे थांबवू ओघळणं वेळेच्या ओंजळीतून, कसे सोसावे मौन उसळते अंतरातून. देवा तुझ्या इच्छेने उलगडती सारे क्षण, जपता जपता उमजले हरवणेही एक जतन. कसे मोजावे श्वास ऋतू बदलत्या क्षणी, कसे सोसावे तुटणे स्वप्न जपलेले मनी. शिकवीत जातो काळ सोडून देण्याचे बळ, पिकले पान गळता वृक्ष होतो रे सबळ. ----अभय बापट २५/१२/२०२५

मन

आता होते असे कधी सापडले मुठीत काही क्षण, आणि उसवते ठायी ठायी अबोध अजाण माझे मन. किती जपावी लागते आता नात्यामधली आपल्या वीण, चुकलेल्या एका क्षणाने फाटते तुटते माझे मन. ओंजळा राहते पुरी रिकामी किती टाळावे लागते रण, सुगंधाच्या क्षणाक्षणाला आतूर उत्सुक माझे मन. कधी टळेल हा ग्रीष्म कधी फुलेल पुन्हा बन, तुझ्या प्रीतीच्या वाटेवर तृषार्त सावळे माझे मन. ----अभय बापट २४/१२/२०२५

ग्रीष्म

तापल्या भूमीच्या कडेवर ग्रीष्माचे ऊन थरथरते, बघून खेळ ढगांचा गालात हळूच हसते. तापल्या तळ्याकाठी निवांत बसतो काळ, पक्षांच्या पंखाखाली सावली शोधते आभाळ. कोकीळेच्या तालावर आम्रवृक्ष करतो नर्तन,  मृगजळाच्या मागून संध्याछायेचे आगमन. ----अभय बापट

ऋतू चक्र

ऋतू चक्र

वाऱ्यावर विहरत आले कोकीळेचे नाजूक सूर वसंताच्या स्वागताला चैत्र वैशाख आतूर. जेष्ठ आषाढ शोधती ग्रीष्माच्या पाऊलखुणा  तापल्या भूमीला लागे वर्षाच्या ऋतूच्या वेणा. श्रावण भाद्रपद येती गाणे भक्तीचे गात श्रावण जागवत येतो शरदाचे चांदणे मनात. शरदाच्या स्वच्छ ऊन्हाला आजीच्या गोधडीचे मन पानगळीच्या आधी साठवतो निसर्ग बीजापोटी धन. उदासवाणा शिशीर करी पानाफुलांचा संहार पानगळ म्हणावी ही की वृक्ष उतरती श्रृंगार. -----अभय बापट.

शेल काव्य-सुटला गारवा

*शेल काव्य चारोळी* *विषय-सुटला गारवा* सुटला गारवा गारवा गुलाबी, गुलाबी सौंदर्या नशा ही शराबी. ----अभय बापट चाहूल घेवून आली आली मेघांची वरात, सुटला गारवा अन्  अन् समुद्र भरात. ---अभय बापट घेवून श्रावण आला आला निसर्ग भरात, सुटला गारवा तरी आला आनंद घरात. --- अभय बापट

बैठकीची लावणी

चंद्र डोईवर आला, जीव होई अधीर कधी येणार सखया, अश्रूंचा सुटला धीर. रात गेली झोप उडाली, धूसर झाली पहाट स्वागताला तुझ्या राया शृंगारली पायवाट मनात पेटली ओढ, उर व्याकूळ खरोखर तुझ्याविना वाटे मला दाही दिशा अधीर. काळजात जखमा जाग्या, श्वास बोलका झाला नाव जपून धरताना माझा श्वासही रेंगाळला तुझ्या नावाचा आठवांनी श्वास सुगंधी अमीर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. नाही सोसवत आता आले तुम्हा मी शरण डोळ्यांतून ओघळती रे नीराचे पिकले धन. भरल्या मनामध्ये नाचे मनमोर मत्त मयूर कधी येणार रे सखया अश्रूंचा सुटला धीर. सोळा शृंगार साज, तुझ्याचसाठी मी केला काजळ, हळद कुंकवी, रांगोळी अंगणी मांडला. ग्रीष्मानीही मांडला एकाकी जीवनी कहर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. घेतले निरांजन हाती, हाती हिरवे कंकण तुमच्या मनात उरावे हेच मला रे भूषण  मनामध्ये माजतोय भयभिषण काहूर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. चंद्र डोईवर आला जीव होई अधीर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. ----- अभय बापट ०६/१२/२०२५

एकाकी राधा

कुठे गेला कान्हा , वाट थांबली जीवाशी युमेनेच्या वाटेवर थरथर दाटे उराशी. नूपुर थांबले माझे, थांबली पावले सारी, राधेवीना एकाकी कृष्णा तुझी रे बासरी योगेश्वर तू जगाचा आले शरण तुला आज आठवणीत अजून तुझा मोरपीसांचा साज. वेळूबनामधून आज वारा वाहे रुणझुण तुझ्यावीन त्यांच्या देही वारा फुंकतो प्राण. आकाशा सारखे तुझे रुप मन भेटण्या अधीर आकाशाच्या गाभ्यातून कृष्ण सगुण साकार. -----अभय बापट ०१/१२/२०२५

वेदना

कृष्णा,तुझ्या लक्षात तरी आले का रे, जगाला गीतेतून कर्मयोगाची दिक्षा देणारा तू, तू मला या राधेला मात्र निवृत्तीचे वरदान दिले. कृष्णा, शक्य तरी होते का तुझ्या रंगात रंगलेली ही राधा दुसऱ्या कोणत्याही रंगात एकरुप होऊ शकेल. कृष्णा, आकाशाला गवसणी घालण्याच्या नादात या राधेच्या मनाच्या अथांग डोहातील वेदना तुला जाणवलीच नाही का ? अरे समर्पण हे माझे प्राक्तन असेल तर ते शतकानुशतके स्त्रीयांच्याच कपाळी का गोंदवून ठेवलेस. कृष्णा,तू युगायुगांना परत येण्याचे वचन दिलेस ही राधा मात्र तुझ्या वचनापासून कोरडीच राहीली, युगे सरली पण ही राधा फक्त वेदनेची, समर्पणाची ओळख बनून राहीली. कृष्णा,तुझ्या बासरीचे सूर अजूनही यमुनेच्या तीरावरुन आकाशाला गवसणी घालतात, पण ते आता या राधेसाठी कधीच नसतात. कृष्णा, तू तुझ्या गीतेतून जगाला जीवनाचे सार शिकवलेस, पण तूच जिचे जीवन आहेस त्या राधाला कोण समजवणार ? कोण कृष्णा, कोण ? ----- अभय बापट ०१/१२/२०२५