Skip to main content

त्रिदल

ग्रीष्म वनातील...मनातील.
 

(१)
तापल्या भूमीच्या कडेवर
ऊन ग्रीष्माचे थरथरते,
बघून खेळ ढगांचा
गालात हळूच हसते.

तापल्या तळ्याकाठी
निवांत बसतो काळ,
पक्षांच्या पंखाखाली
सावली शोधते आभाळ.

कोकीळेच्या तालावर
आम्रवृक्ष करतो नर्तन, 
मृगजळाच्या मागून
संध्याछायेचे आगमन.


(२)
आता होते असे कधी
सापडले मुठीत काही क्षण,
आणि उसवते ठायी ठायी
अबोध अजाण माझे मन.

किती जपावी लागते आता
नात्यामधली आपल्या वीण,
चुकलेल्या एका क्षणाने
फाटते तुटते माझे मन.

ओंजळा राहते पुरी रिकामी
किती टाळावे लागते रण,
सुगंधाच्या क्षणाक्षणाला
आतूर उत्सुक माझे मन.

कधी टळेल हा ग्रीष्म
कधी फुलेल पुन्हा बन,
तुझ्या प्रीतीच्या वाटेवर
तृषार्त सावळे माझे मन.


(३)
 कसे जपावे अंतरी
पिकल्या पानाचे भान,
कसे राखावे अंतर
मनी भृंगाचे गुंजन.

देवा असे का मांडतो
ऋतु भरले हे सण,
चातकासम आतूर
रुपगंधीत माझे मन.

कसे थांबवू ओघळणं
वेळेच्या ओंजळीतून,
कसे सोसावे मौन
उसळते अंतरातून.

देवा तुझ्या इच्छेने
उलगडती सारे क्षण,
जपता जपता उमजले
हरवणेही एक जतन.

कसे मोजावे श्वास
ऋतू बदलत्या क्षणी,
कसे सोसावे तुटणे
स्वप्न जपलेले मनी.

शिकवीत जातो काळ
सोडून देण्याचे बळ,
पिकले पान गळता
वृक्ष होतो रे सबळ.

----अभय बापट
२५/१२/२०२५



Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४