Skip to main content

Posts

Showing posts from 2024
रेखू नकोस रेखा डोळ्यात काजळाची आधीच वार त्यांचा जिवघेणा फार आहे. कशी समजून घ्यावी भाषा इशाऱ्याची नजरेस तुझ्या बघ कमाल धार आहे. मेघांची सावली ही देहास ऊब देते आता पाघळण्याचा माझा विचार आहे. ओठांवर मार्दव्याची लाली कमाल आहे मौनातूनही सहमतीचा तेथे उच्चार आहे. शब्दाचाही मांडलास असा छळ आहे तुझे मुके राहणे हा अनोखा वार आहे. ------अभय बापट         २३/१०/२०२४

आशा..

असेच एकट्याने चालू अजून थोडे नवीन वळणावरुन, चालू अजून थोडे. धरुन आशा मनी आणि स्वप्ने उराशी नव्या उमेदीने,चालू अजून थोडे. कशाला हवे सोबतीला अजून कोणी घेवून आठवणींना, चालू अजून थोडे. सावलीला नसते ओळख कधी कुणाची पांघरुन उन्हाला, चालू अजून थोडे. काट्याकुट्यांची करुन सवय घेवू रक्ताळू दे पावलांना, चालू अजून थोडे. सोडून पायवाट चालू पुन्हा नव्याने घेरु दे श्वापदांना, चालू अजून थोडे. उतरुन रणात जिंकू किंवा हारु ही लढू या निश्चयाने, चालू अजून थोडे. ---- अभय बापट १२/०७/२०२४

माणसं --- विजय तरवडे

ओळख पुस्तकांची...   माणसं---- लेखक विजय तरवडे          ही माणसं,तुमच्या आमच्यातली, आठवणीत डोकावून पहायला लावणारी.ही वल्ली नाहीत, ही अरभाटही नाही कारण ही आहेत खरीखुरी माणसं आपल्यातील, आपणचं.                       श्री. विजय तरवडे यांची ही माणसं आपल्याला आपल्या भुतकाळाची आठवण करुन देतात. काही चुका, काही आनंदाचे क्षण,  आपल्या तरुणपणातील न विसरता येणाऱ्या माणसांचे पुन्हा स्मरण करुन देतात.                      खुपपुर्वी ललित साहित्य आवडीने वाचले होते. नंतरच्या काळात रहस्यकथा,साहसकथा,भयकथा, विज्ञानकथांची पारायणे करुन झाली.                        पुन्हा नव्याने ललित साहित्य आणि व्यक्तीचित्रांच्या मोहमयी दुनियेत ज्यांनी बोट धरुन फिरवून आणले ते रविंद्र पिंगे इथे आहेत. जयवंत दळवी इथे आहे. सहसा दुर्लक्षित राहीलेले सुहास शिरवळकर ज्यांच्या बहुतेक सर्व साहित्याची पारायणे पुन्हा पुन्हा केली ते आनंद...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४

गारुड

होते जरी सुगंधी परडी दररोज येथे तरीही फुटत नाही पाझर अत्तराचा. ---अभय बापट १५/०५/२०२४

बोभाटा

तुझ्या लाघवी गुणांचे चाहते हजार होते तरी एका अवगुणाचा गलबला फार झाला. ----अभय बापट १३/०५/२०१४

ग्रहण

ढगाआड गेला जरासा चंद्र माझा लागले कित्येक नजरांना ग्रहण फुकाचे. ----अभय बापट १३/०५/२०२४

तुझे रुप

माझ्या लाडक्या मैत्रीणीसाठी....  ...शमा.... तुझे रुप घेवून प्राजक्त आला मोगऱ्याला लावला तू सुगंधी लळा. तुझ्या यौवनाने  उजळली दिशा ती तुझ्या बोलण्याने स्वरांना गायनी कळा. तुझ्या रुपातूनी घेवून रंग आकाशाने नेसली वस्त्रे नवी, तुझ्या केसातून उतरुन आली दामीनी जगाला भेटायाला. तुझ्यात रुपाने आली साक्षात अप्सरा येथे मदनाने घेतला रंग निळा सावळा. सोनसळी रंग लेवून आला सृष्टीला लाभला रंग कोवळा तुझ्या गंधाने असा कल्लोळ केला कस्तुरीच्या लागला कपाळी टिळा. तुझे गुण घेवून शब्द धावून आले, तुझे गीत गाणे सुगंधी सोहळा. ..अभय बापट *************** तुझे रुप घेवून प्राजक्त आला मोगऱ्याला लावला तू सुगंधी लळा. तुझ्या यौवनाने  उजळली दिशा ती तुझ्या बोलण्याने स्वरांना  गायनी कळा. तुझ्यात रुपाने आली अप्सरा येथे, मदनाने घेतला रंग  निळा सावळा. तुझ्या गंधाने असा  कल्लोळ केला कस्तुरीच्या नावाचा  ललाटी टिळा. तुझे गुण घेवून शब्द धावून आले, तुझे गीत गाणे सुखाचा सोहळा. अभय बापट २३/०४/२०२३

एकाकी

एकेक फांदी माझी मी दूर सारत गेलो एकाकी जगण्याचा मी सराव करत गेलो. आपुलकीचे ओल यावे मुळांतून जरासे श्वासाचे युद्ध मी क्षणाक्षणाला हरत गेलो. धरू कशी उभारी आयुष्या सांग आता मुळाकडून मी आतून सुकत गेलो. मला जराजरासे स्वप्नांचे वेड होते झोपेविना तसाच मी रात्री झुरत गेलो. गाईन कौतुक तुझे शायरीतून माझ्या शब्दांनी काळीज माझे मीच कुरतडत गेले. ----अभय बापट २५/०४/२०२४
कशाला एवढी वाट बघतेस वेळ टळून जाण्याची, वेळही तुझ्यासाठी ताटकळत उभा असतो. ---अभय बापट २०/०४/२०२४

रिक्त

सप्रेम द्या निरोप मी रिक्त होत आहे सोडून सारे सत्व मी भक्त होत आहे. उजेडाला मिरवून मी मोठे काय केले. काळोखात जाण्यास मी उद्युक्त होत आहे. मारीत बाता मोठ्या जगामध्ये फिरलो त्यांच्या शक्तीवर मी अनुरक्त होत आहे. घर मोठे पोकळ वासा असे सारे झाले आतून आतून आता मी अशक्त होत आहे. मोठ्या लोकांचे नाव मुखी काय झाले त्यांच्या विचारधारेपासून मी मुक्त होत आहे. अवघड प्रश्न मांडले जगण्याने माझ्यापुढे सोडून सारी भिड आज मी व्यक्त होत आहे. ---अभय बापट २०/०४/२०२४

संहार

माणसाच्या दु:खाला नाही पारावार हल्ली बोकडाच्या मरणाला असतो का वार हल्ली. पावसाने मांडलाय अनाचार सारा माणसाने आरंभला आहे ऋतू संहार हल्ली. देव भेटतो देवळात म्हणतात सारे देवळाला ही कळतो व्यवहार हल्ली. मांडतात आजकाल मरणाचे सोहळे मनामध्ये जपून द्वेषाचा अंगार हल्ली. कसे जगावे माणसाने सांग आता उजेडाच्याच पायतळी अंधार हल्ली. देतोस रोज नव्याने सोनसळी स्पर्श तुझा पालवीनीच सोडला आहे धीर हल्ली. काय सांगू स्वप्नातल्या चांदण्या तुला तूच तू जगण्याचा आधार हल्ली. त्या सुगंधी भावनांना कोठून आणू फक्त तुझ्याच पाशी कस्तुरीचे कोठार हल्ली. -----अभय बापट १६/०४/२०२४

योग्य ठिकाण

योग्य ठिकाणी असले तर १० वॅटच्या बल्बला झीरोचा बल्ब म्हणून मान्यता मिळते आणि त्याला गुपचुप १० वॅट वीज कायदेशीररीत्या गिळंकृत करता येते. ----अभय बापट ०८/०४/२०२४

छोटसं स्वप्न

         आपण दोघांनी एकत्र जगलेल्या क्षणांना आणि एकत्र बघितलेल्या स्वप्नांना नाजूक सुगंधी फुलांसारखे ओंजळीत जपून ठेवलं होत मी.           वाटलं होतं कधीतरी तु स्वत:च्या ओंजळीत घेवून आपल्यावरती उधळशील ती, आपले भविष्य सुगंधी करण्यासाठी....           बसं एवढंच तर छोटंसं स्वप्न होतं माझं आपल्या बाबतीत....          आता तर ती फुलंही नाहीत, आठवणीतला तो सुगंध तेवढा शिल्लक उरला आहे, एखाद्या शापासारखा,कधीही उःशाप न मिळणारा. -----अभय बापट ०४/०४/२०२४

भाव

मानू नकोस देव टोळीस दानवांच्या तेवढा सीधासाधा त्यांचा स्वभाव नाही. येणार ना कुणीही मदतीस मानवाच्या पैशाशिवाय कशाचा तेवढा प्रभाव नाही. घेवून घाम हाती किती फोडशील टाहो कष्टास आता इथे थोडाही भाव नाही. नको लावूस ठिगळे झोळीस फाटक्या या आता मनात शिल्लक मानवतेचे नाव नाही. माया, कपट यांचा आता इथे बोलबाला मरण्याशिवाय आता कोणता उपाव नाही. ------ अभय बापट २९/०३/२०२४
भाळू नकोस पुन्हा शब्दास कौतुकाच्या ज्यांनी उभा वसंत त्वेषाने जाळला होता. ---- अभय बापट

कृतज्ञता

बोलून सांगण्याचा प्रयत्न व्यर्थ होता मुक राहण्यातच थोडासा स्वार्थ होता. पोळले होते पाय तापल्या रस्त्यावरती थोड्याशा सावलीला तेव्हाच अर्थ होता. कृतज्ञतेने जपली आठवण सावलीची तिथे माझा देव आणि तिथे परमार्थ होता. नांदले होते रामराज्य कधी आपल्या इथे मनातला राम तेव्हा स्वतंत्र आणि समर्थ होता. -----अभय बापट ११/०१/२०२४

सांग ना !

तू "काय झालं ?" विचारल्यावर मी "काही नाही" असं उत्तर देतो तेव्हा मनाच्या आतमध्ये खोलवर खुप काही होत असतं,हे तुला कधीच कसं ग कळत नाही ? खुप काही गमावल्या सारखं वाटतं तेव्हा, ते तुळा कळू नये म्हणून तुझी नजर टाळतो मी,पण तेव्हा हवे असतात चार आपुलकीचे,धीराचे शब्द आणि थोडासा मायेचा ओलावा," शब्दावाचुन कळले सारे शब्दांचे पलिकडले" हे फक्त शब्दातच राहणार का ? कधी खरे होणार नाही, सांग ना! -- अभय बापट १०/०१/२०२४