Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

निरर्थकाची डायरी ६

निरर्थकाची डायरी -             आपल्याला एखादे फुल,फळ आवडते,आपण त्याचे बी मिळवून रुजत घालतो. ते रुजवताना आपण आपली सोय बघतो. रोप रुजून येते आपण काळजी घेतोच.                आपण त्या रोपाच्याच एवढे प्रेमात पडतो की आपल्या सोयीनुसार रुजवलेले ते रोप त्याच्या आवश्यकतेनुसार योग्य जागी लावायचेच विसरुन जातो.                  प्रत्येक झाडाला त्याची त्याची स्पेस हवी असते, त्यांची गरज वेगवेगळी असते.                    ती योग्य स्पेस, योग्य वातावरण मिळाले नाही तर ती खुरटतात किंवा ती जोरदार वाढली तरी त्यांची वाढ आपल्यालाच त्रासदायक ठरते.                     जे झाड आपण जपले तेच तोडून टाकण्याची वेळ आपल्यावर येते.                      प्रत्येकाला हवी ती स्पेस योग्यवेळी मिळेल हे बघितलं तरच हे साहचर्य आनंददायी ठरते.

निरर्थकाची डायरी ५

निरर्थकाची डायरी -                  छोटे-मोठे व्यवसाय करणारे,रस्ताच्या बाजूला फुलं,फळं, भाजी विकणारे, आपल्या धंद्यासाठी लागणारे काही सामान पुठ्ठे,फळीचे तुकडे, छोट्या टोपल्या तिथेच बाजूला ठेवून धंदा बंद करुन घरी जातात.                 त्या वस्तू किंमतीने कमी असतात पण त्यांच्या वेळवर त्या त्यांच्यासाठी अनमोल असतात.                आजकाल काहीजणं या वस्तू उचलून घेवून जाताना दिसतात. या उपयोग नसलेल्या वस्तू नंतर फेकून दिल्या जात असतील. पण फुकटचं मिळालं या क्षणाभराच्या समाधानासाठी त्या छोट्या धंदेवाल्या मानसिक त्रास दिला जातो.                 अशा उसन्या समाधानाने खरी मानसिक शांती कधीच मिळत नाही हे त्यांना कळतच नाही.

वाफ,बुरशी, म्युकरमायकोसिस

बुरशीची उत्पत्ती दमट ठिकाणी होते मग वाफ घेण्यामुळे दमटपणा वाढतच असेल.            एक डॉक्टर छद्मीपणाने वैद्यांना म्हणाले होते, " हमारे पास अँण्टीबायोटिक्स है, आपके पास क्या है" ?              त्यावर त्या वैद्यांनी सांगितले होते," ज्या वातावरणात जंतूंची उत्पत्ती- वाढ होते ते वातावरण तयारच होणार नाही याची काळजी आयुर्वेद घेते".

असे ही वाहवत जाणे

विचार करुन करुन डोक्याचे भजे झालेय.        हिमालया ही कंपनी आयुर्वेदिक औषधे बनवते, तिची सेप्टिलीन किंवा लिव ५२ वैद्यांपेक्षाही ॲलोपॅथीचे डॉक्टर जास्त वापरतात. म्हणून ती आमची.         पण ती स्वदेशी कंपनी नाही,तीचा मालक भारतीय नाही,आपण तर स्वदेशीचाच वापर करायचा.          ती स्वातंत्र्या आधीपासून भारतात प्रॉडक्शन घेतेय,ती आपलीच भारतीय.           पण तीचा मालक तर हिंदू नाही  मग त्या कंपनीची औषधं बॅन केलीच पाहिजेत.            छे, काही समजतच नाहीये,झोपून जावे हेच चांगले.             गुड नाईट.

निरर्थकाची डायरी ४

निरर्थकाची डायरी - बुद्धी भ्रम करता आला पाहिजे, "मी बोलतो तेच अंतिम सत्य" हे श्रोत्यांच्या मनावर बिंबवतो तोच उत्तम व्याख्याता, यशस्वी बुवा, कुटिल राजकारणी.

निरर्थकाची डायरी ३

निरर्थकाची डायरी-               "कॅरीबॅगेतली कडधान्याची पॅकेट्स काढून त्याच कॅरीबॅगमध्ये भाजी भरुन फ्रीजमध्ये ठेवणे", एवढे सोपे असते का त्वचारोपणाची प्रक्रिया? किंवा          "अंड्यांच्या ट्रे मधले नासके अंडे काढून टाकून त्या रिकाम्या जागी दुसरे अंडे ठेवणे", एवढे सोपे असते अवयवांचे प्रतिरोपण?            व्हॉट्सअप फॉरवर्ड्स वाचून अनेकांचा नक्की असाच समज झाला असणार.              शरीर बाहेरुन आलेली कोणतीही गोष्ट सहजासहजी स्विकारत नाही, प्रतिकारशक्ती त्याला हाकलून काढायचा प्रयत्न करते.              आमच्या गावातील नानांची देहदानाची इच्छा असूनही इकडे ती सोय उपलब्ध नाही म्हणून नोंदणी करता आली नाही.              एटीएस ही कंपनी सर्वात मोठ्या प्रमाणात कृत्रिम त्वचेची निर्मिती करते. वैद्यकीय किंवा इतर कारणांनी लहान मुलांची सुंता केली जाते,त्या छोट्याशा तुकड्यापासून क्रिकेट ग्राउंड एवढी त्वचा निर्माण ह...

निरर्थकाची डायरी २

निरर्थकाची डायरी - कोणाकडून काय घ्यावे.... सरड्याकडून रंग बदलण्याची कला. सापाकडून उलटे फिरण्याची,डूख धरण्याची कला. बेडकाकडून कठीण प्रसंगात गायब होण्याची कला. किड्यापासून स्वत: भोवती कोश बनवण्याची कला. कासवापासून संकटाच्या वेळी लोकांच्या नजरांपासून लपून बसण्याची कला. खेकड्यापासून पाय ओढण्याची कला. मुंगीपासून अविरत ध्येयाकडे कणाकणाने सरकत राहण्याची कला. सातभाई पक्षांकडून घोळका करुन कर्णकर्कश आवाजात गोंगाट करण्याची कला. वाळवी कडून आतून पोखरत राहण्याची कला.

निरर्थकाची डायरी १

निरर्थकाची डायरी               छोटं मुल कागदावर रेघोट्या ओढतं, त्याला काही अर्थ नसतो, कला नसते पण आईच्या नजरेला मात्र त्या फुलं,अक्षर,तर कधी देवबाप्पाही दिसतो.               तसंच हे अर्थहीन लिखाण, एका अनामिकाच्या डायरीतले. निव्वळ टाईमपास.                 निरर्थकाची डायरी -          वाऱ्याला पाहून दिशा बदलणे योग्य असते असे सगळेच म्हणतात पण ते फक्त तग धरून राहण्यासाठी. जी झाडं वादळी वाऱ्यात दिशा बदलतात ती कमजोर झालेली,झोडपली गेलेलीच दिसतात.        जी झाडं वाऱ्यातही ठाम राहतात ती महावृक्ष म्हणून ओळखली जातात. ती स्वत:चा आधार स्वत:च निर्माण करतात ती वटवृक्ष म्हणून पूजनीय ठरतात.        प्रत्येक वेळी क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपले वागणे बदलले तर आपले असे काहीच उरत नाही.         आपल्या रस्त्यावर, आपल्या विचारावर, आपल्या वागण्यावर ठाम असणे हेच मनाला खरे समाधान मिळवून देते.

मनाची शिट्टी

मने,           प्रेशर कुकरची शिट्टी कशी काम करते तुला माहीतच आहे. कुकरमध्ये प्रमाणाबाहेर वाफ कोंडली जावून त्याचा स्फोट होवू नये म्हणून ही शिट्टी.           माणसाच्या मनालापण अशी एखादी शिट्टी बसवली असती तर ? किती सहजतेने कोंडलेले मन मोकळे झाले असते.           पण नीट बघितले तर मनालासुद्धा अशी शिट्टी असतेच. कधी एखादे ठिकाण माणसाच्या मनावरचा ताण कमी करते, कधी एखाद्या माणसाचा सहवास,  कधी एखादे हलकेसे स्मित, कधी एखादा फोन कॉल मनावरचा ताण कमी करतो.           काल सहज छोट्या बहिणीशी बोलताना जाणवले, भडाभडा कॉलवरती बोलत होती, जणू गेल्या पाऊण महिन्यात मनात कोंडलेल्या भावनांपासून मुक्त होतेय, हे चक्क जाणवत होते.            खरंच मनाला तणावमुक्त करु शकणारी माणसं, ठिकाणं जपली पाहिजेत, काहीजणं आपल्यासाठी या शिट्टीची भुमिका बजावत असतील तर काहीजणांसाठी आपणही त्याच भूमिकेत असू.           सगळं काही बोलून मोकळं होता आलं पाहिजे. तेवढेच दुसरं बोलत असतान...
मी कविता केली,  अगदी चित्रावरती कविता केली, आधी कविता रागवली मग चित्रा कावली. आता ती कविता स्मृती बाहेर फेकून दिली, त्यामुळे आनंदी वृत्ती  पुन्हा एकदा उफाळून आली. ही कला सर्वांनाच साधत नाही. ही उपासनेची समृद्धी सगळ्यांच्या आयुष्याला ज्योती बनून उजळवत नाही.

रितेपण

तुझं रितेपण माझ्या रितेपणाहून मोठं आहे, माझ्या रितेपणात तू आहेस तुझं एकटं एकटंआहे.

अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

मने,      आज अक्षयतृतीया, कृषीसंस्कृतीतील पेरणीचा दिवस, आज जे जे पेरु ते सहस्त्र मात्रेने परत मिळते. आजच्या दिवशी पावसाळी भाजीपाल्याचे बी पेरले जाते.       आज गरज आहे ती आरोग्याची, इम्यूनिटीची, त्याचे कणभर बिजरोपण आज आपण आपल्या दिनचर्येत करु,आणि प्रकृती आपल्याला भरभरुन परत करेल हा विश्वास मनी बाळगूया.      आरोग्य, विश्वास,सुखसमृद्धी अक्षय टिकू द्या या प्रार्थनेसह सर्वांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा.
आपली संस्कृतीच विरोधाभासाने भरलेली आहे, आस्था म्हणून आंधळेपणाने संस्कृतीच्या साखळीला गुरासारखे बांधून घेण्यापेक्षा,डोळसपणाने त्यातील कमकुवत कड्या दूर सारुन ती अभिमानाने धारण करणे हाच समंजसपणा.

मदर्स डे

"आज मदर्स डे आहे, मातृदिन तर पिठोरीलाच". असे कोणीही लिहीलेले दिसले नाही.           आभाळ कोणत्याही कॅलेंडरचे किंवा पंचांगाचे,    दिवस-रात्रीचे  मोहताज नसते, ते कायम तुमच्या सोबतच असते, आईच्या मायेसारखेच.  अगदी तुम्ही तुम्हाला तुमच्या कोशात गुरफटून घेतले असल, तुम्हाला दिसत नसले तरीही.            आभाळ कवेत घेता येत नाही म्हणतात तसेची आईची माया ही, ना ती शब्दात मांडता येत, ना एका रुपात दाखवता येत.              जन्म देणाऱ्या आई व्यतिरिक्त असंख्य माय तुमच्यावर माया करत असतात, लळा लावत असतात, तुमचे हित चिंतत असते.                "आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे", अशी प्रार्थना करुन त्या अफाट आभाळात एकरुप होण्याचा प्रयत्न करायचा, कोणावरतरी तीच माया,प्रेम आपल्या छोट्याशा मुठीत उधळून टाकण्यासाठी .

पावसाचा ऋतू आला

आठवणींनी तुझ्या बघ आभाळालाही कढ आले, बघून भुईमधूनी आशेचे कोंब रुजले. मेघांचे बघ नभात नृत्य चाले, धरतीच्या कायेवरती धुळीचे रोमांच उठले. पावासाचे दिन बघ परत जवळ आले, सृष्टीने नटून  नववधूचे रुप ल्याले.