निरर्थकाची डायरी-
"कॅरीबॅगेतली कडधान्याची पॅकेट्स काढून त्याच कॅरीबॅगमध्ये भाजी भरुन फ्रीजमध्ये ठेवणे", एवढे सोपे असते का त्वचारोपणाची प्रक्रिया?
किंवा
"अंड्यांच्या ट्रे मधले नासके अंडे काढून टाकून त्या रिकाम्या जागी दुसरे अंडे ठेवणे", एवढे सोपे असते अवयवांचे प्रतिरोपण?
व्हॉट्सअप फॉरवर्ड्स वाचून अनेकांचा नक्की असाच समज झाला असणार.
शरीर बाहेरुन आलेली कोणतीही गोष्ट सहजासहजी स्विकारत नाही, प्रतिकारशक्ती त्याला हाकलून काढायचा प्रयत्न करते.
आमच्या गावातील नानांची देहदानाची इच्छा असूनही इकडे ती सोय उपलब्ध नाही म्हणून नोंदणी करता आली नाही.
एटीएस ही कंपनी सर्वात मोठ्या प्रमाणात कृत्रिम त्वचेची निर्मिती करते. वैद्यकीय किंवा इतर कारणांनी लहान मुलांची सुंता केली जाते,त्या छोट्याशा तुकड्यापासून क्रिकेट ग्राउंड एवढी त्वचा निर्माण होते.
आता काळी बुरशी, पिवळी बुरशी,पांढरी बुरशी यांची चर्चा जोरदार सुरु आहे, काल एकजण तावातावाने म्हणाला, संशोधकांनी सर्वप्रकारच्या बुरशी नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. पण एका बुरशीपासून बनवलेल्या औषधाच्या सहाय्यानेच रोपण केलेल्या अवयवाला विरोध करणारी शरीरातील प्रणाली क्षीण करता येते.
ज्या देशात साध्या हॉस्पिटल्सची, ऑक्सिजन्सची, बेडसची, मृतांवर अंतिम संस्कार करण्याची सोय नाही, त्या देशात हजारो लोकांचे अवयव पळवून ते योग्य रितीने जतन करण्याची, त्याचे आवश्यक त्या रुग्णावर तातडीने रोपण करण्याची सोय देशभर,खेडोपाडी आहे याच्यावर तुमचा खरंच विश्वास बसतो ?
Comments
Post a Comment