Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

उमेद

चेहऱ्याला सजवावे म्हणतो अश्रूंना लपवावे म्हणतो, नव्या ऋतूच्या स्वागताला नव्याने उमलावे म्हणतो. पुन्हा एकदा रुजावे म्हणतो वादळवाऱ्यात तगावे म्हणतो, कोसळणाऱ्या प्रपातातून स्वत:ला वाचवावे म्हणतो. पुन्हा एकदा उडावे म्हणतो आभाळाला भेटावे म्हणतो, सुकलेल्या एका दाण्यासाठी दोन थेंब मागावे म्हणतो. पुन्हा एकदा जगावे म्हणतो ताठ उभे रहावे म्हणतो, खोल ओलाव्याच्या शोधात खोल खोल जावे म्हणतो. झाडांपासून शिकावे म्हणतो स्वत:ला सावरावे म्हणतो, नको असलेले ओझे टाकून पुन्हा एकदा बहरावे म्हणतो. ----- अभय बापट २२/०५/२०२२

दुकानदारी---एक सहज सोपा व्यवसाय

      दुकानदारी---एक सहज सोप्पा व्यवसाय.        आपल्या धंद्याची सूरवातच " मी माझा वेळ जाण्यासाठी चालू केला आहे" इथून होते. मग धंदा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपल्या लहरीवर अवलंबून असते यात नवल ते काय ?        आपला बिझनेस स्टडी काय असतो ? कोणता धंदा,व्यवसाय आपल्या जवळपास सुरळीत जोमाने चालू आहे ते बघायचे आणि त्याच्या बाजूलाच तोच व्यवसाय सुरु करायचा, शेजारच्याचे ५०% तरी ग्राहक आपल्याकडे येतीलच या विश्वासाने आणि मग हातखंडे प्रयोग चालू करायचे,स्वत:चा उद्योग वाढवण्यासाठी नाही बरं का, शेजाऱ्याचे दिवाळे निघावे यासाठी.        व्यवसाय आणि कुटुंब,मित्रमंडळी यांना वेगवेगळे ठेवणे आपल्याला कधीच जमत नाही. तुमच्या व्यवसायाचा फायदा उठवायला सगळी असतात पण तुम्हाला मदत लागेल त्या गरजेच्या वेळी कोणीच धावून येत नाही.       आपण वस्तू एमआरपी पेक्षा २ रु. जास्त घेवून विकतो आणि कोणी विचारलेच तर " आमचा हा रेट आहे,हवं घ्या" हा आपला रोखठोकपणा आपल्या तोंडात हजर असतोच.        आपल्याला गिऱ्हाईकाकडून जास्त...

त्रयस्थ

       स्वत:कडे त्रयस्थपणे बघता आले पाहीजे.   तरुण मुलांच्यात एका नवीनच अंधश्रद्धा वाढीला लागलेली दिसतेय, "फेसबुकवर पोरी पटतात" अनेक तरुण मुलं फेसबुकवर या उद्देशाने उंडरलेली दिसतात.   त्यांनी स्वत:कडे त्रयस्थ नजरेनी बघितले पाहीजे,आपल्याकडे असे काय आहे की एखाद्या मुलीने आपल्या प्रेमात पडावे. आपल्याकडे शिक्षण,नोकरी-व्यवसाय, संपत्ती,पर्सनॅलिटी असे काय स्पेशल आहे. स्वप्न बघणं गुन्हा नाही पण ती आपल्या आवाक्यातली असावी, आणि स्वप्नांची बाग फुलवताना खोटेपणाचे पाणी घालावे लागू नये एवढेच. नाहीतर मग मान खाली घालावी लागते स्वत:ला आणि घरातल्या साध्यासरळ पालकांनाही. ---------अभय बापट

जगणे

जगलेल्या प्रत्येक क्षणात मी समाधान शोधत होतो आनंदाच्या प्रत्येक क्षणात मी नव्याने जगत होतो. येत होते फुल आनंदाचे क्षणोक्षणी हातात माझ्या त्या प्रत्येक क्षणाला मी नवा जन्म मानत होतो. बहरत होती बाग फुलांची कित्येकदा नव्याने श्वास घेता घेता मी रोज नव्याने बहरत होतो. सावधपणाच्या हाका कित्येक वेळा आल्या कानी प्रत्येक हाकेला मी नव्याने प्रतिसाद देत होतो. काटेरी झाडांचे रान माजते कारण नसताना अविनाशी राहण्यासाठी पुन्हा पुन्हा झगडत होतो. ------- अभय बापट १९/०५/२०२२

परतीच्या वाटेवरती असेच घडते

परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते... शब्द सारे मुके होती,डोळ्यांमध्ये पाणी भरते सोडून जाता इथेच सारे,पाऊल ही डळमळते.।। निसर्ग आणी त्याची महता,तूच वसतसी तीथे तत्वता, तुझ्या रुपाने आयष्याचे सार्थक हे होते।। तूच सावरते,तूच घडवते, तूच घड्यांना आकार देते, तुच मांडतो,तूच मोडते,खेळ मोडूनी हाक मारते।। तुझी महती जाणूनही,खेळामधेच मन अडकते. परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।। जीच्यासाठी केले सारे, तीच्यापासून मन दूर पळते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।। समस्यापूर्तीमधली कविता KVD

वास्तव

जो जगण्याला विटला नाही असा कोणीही भेटला नाही. घेतला वसा प्रेमाने वागण्याचा तो थोडा वेळही टिकला नाही. धावला प्रत्येकाच्या अडचणीत स्वत: अडचणीतून सुटला नाही. काढल्या हजार चुका लोकांच्या चुकांमधून स्वत: शिकला नाही. राबला तो आपुलकीच्या ओढीने खिसा कधी सुखाने भरला नाही. दिवा धरला हातात सदा लोकांसाठी पायतळीचा अंधार कधी सरला नाही. --- अभय बापट १३/०५/२०२२

माझं गाव

  बोरकरांनी "माझा गाव" कवितेत लिहीलय,         "जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले.          काळोखात कुणीतरी ज्योत घेउन आलेले."   आता माझे गाव खरंच असे राहिले आहे, नाही ! पण आपल्या मनात अजून तेच जूने आठवणीतले गाव तसेच आहे कारण आपले त्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.    आपल्या वाटचालीत अशी असंख्य छोटीमोठी गावं आपल्याला भेटतच असतात, आपण पुढे निघून गेलो तरी या गावांबद्दल असेच कायम कृतज्ञ राहीले पाहिजे.     गावं तशीच राहात नाहीत त्यांची शहरं होत जातात,ती विस्तारत जातात,त्यांच्या रस्त्यावरचे आपले ठसे पुसट होत जातात,तरीही आपण मात्र आठवणीतले ते गाव प्रेमाने जपले पाहिजे.ज्यांनी आपल्याला भरभरुन दिले.     माणसं तरी कुठे वेगळी असतात,गावच ती, गजबजलेली. जी आठवणीत जपली पाहिजेत,ज्यांची आठवण जपली पाहिजे,कृतज्ञतेने त्यांच्यात कितीही बदल झाला तरी.        पावसानी अंगणात थैमान मांडलेले        कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले.         कोपला होताच सूर्य डोईव...

देव

पावसानी अंगणात थैमान मांडलेले कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले. कोपला होताच सूर्य डोईवरचा कधीचा कोणीतरी सावलीचे झाड होवून आलेले. सरली होती ऊब अंगातली कधीची कोणीतरी हळूवार मिठीमध्ये घेतलेले. पेटला होता अंगार सभोवताला द्वेषाचा कोणीतरी येवून मनावर फुंकर मारुन गेलेले. संपत नसतो ओलावा एकाच वेळी जगामधला कोणीतरी असतेच नेहमी देव म्हणून भेटलेले. --- अभय बापट ०९/०५/२०२२

कसं सांगू

कसं सांगू...... तुझ्या मनातील समृद्धी नसतो देवू शकलो सुखाचा सावली नक्कीच धरली असती,कसं सांगू. रंगीबेरंगी जग नसतं दाखवू शकलो रंगीबेरंगी नात्यांचे गाव आंदण दिले असते, कसं सांगू. माझ्या डोळ्यातील अश्रू बघून परत फिरलीस तू तुझ्या अश्रूंसाठी रुमाल झालो असतो, कसं सांगू. उत्कर्षाची ओढ प्रत्येकालाच असते या जगात समाधानाचे नाणेच खणखणीत वाजते, कसं सांगू. स्वप्नांच्या भरारीला नसते बंधन आकाशाचे सत्याच्या घरट्याकडे परतावेच लागते,कसं सांगू. तू शब्दाच्या आधीचे आणि नंतरचे विरामचिन्ह तुझे नाव येण्यापूर्वी थांबावे लागते,कसं सांगू. कसं सांगू म्हणताना खुप काही बोलून गेलो तुझ्यापर्यंत पोचण्याआधी शब्दांना रोखावे लागते, कसं सांगू. ०७/०५/२०२२

पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया..

पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया, विखुरलेल्या आनंदाला सारे मिळू वेचूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. गप्पाटप्पा आणि गाणी रुसवेफुगवे याची कहाणी हरवलेल्या स्वप्नांना डोळे भरून पाहूया.          पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. तू तू मी मी खुप झाले आता सारे विसरु या गुंतलेल्या धाग्यातून पुन्हा मैत्री विणूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. वर्ष सरतील आणि पावसाळे वादळ वारे आणि उन्हाळे एकमेकांच्या सोबतीने आपापले घरटे जपूया.          पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. तुमचे आमचे सेम असते कधी चांदणे कधी ऊन असते काळोख्या रात्रीकडे उजेड होवून धावूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. ०२/०५/२०२२

मोगरा

मौनातून मोगऱ्याने दोन सुगंधी शब्द दिले, त्या शब्दांनाच मी कविता असे नाव दिले. अंगणामधला धुंद मोगरा मनामध्ये गजबजून जातो, आणि तिच्या केसांमधल्या श्रावणधारा घेवून येतो. अजून त्या झुडपामधला बटमोगरा हळूच हसतो, आणि माझा पाय हळूच तिच्या घराकडे पुन्हा वळतो. काळ्याकाळ्या नागीणीला मोगऱ्याची भेट वाहतो आणि तीच्या नजरमधून चंद्र उगवताना पाहतो. ---- अभय बापट ०१/०५/२०२२