बोरकरांनी "माझा गाव" कवितेत लिहीलय,
"जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी ज्योत घेउन आलेले."
आता माझे गाव खरंच असे राहिले आहे, नाही !
पण आपल्या मनात अजून तेच जूने आठवणीतले गाव तसेच आहे कारण आपले त्यावरचे प्रेम तसूभरही
कमी झालेले नाही.
आपल्या वाटचालीत अशी असंख्य छोटीमोठी गावं आपल्याला भेटतच असतात, आपण पुढे निघून गेलो तरी या गावांबद्दल असेच कायम कृतज्ञ राहीले पाहिजे.
गावं तशीच राहात नाहीत त्यांची शहरं होत जातात,ती विस्तारत जातात,त्यांच्या रस्त्यावरचे आपले ठसे पुसट होत जातात,तरीही आपण मात्र आठवणीतले ते गाव प्रेमाने जपले पाहिजे.ज्यांनी आपल्याला भरभरुन दिले.
माणसं तरी कुठे वेगळी असतात,गावच ती, गजबजलेली. जी आठवणीत जपली पाहिजेत,ज्यांची आठवण जपली पाहिजे,कृतज्ञतेने त्यांच्यात कितीही बदल झाला तरी.
पावसानी अंगणात थैमान मांडलेले
कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले.
कोपला होताच सूर्य डोईवरचा कधीचा
कोणीतरी सावलीचे झाड होवून आलेले.
सरली होती ऊब अंगातली कधीची
कोणीतरी हळूवार मिठीमध्ये घेतलेले.
पेटला होता अंगार सभोवताला द्वेषाचा
कोणीतरी येवून मनावर फुंकर मारुन गेलेले.
संपत नसतो ओलावा एकाच वेळी जगामधला
कोणीतरी असतेच नेहमी देव म्हणून भेटलेले.
---- अभय बापट
०९/०५/२०२२
Comments
Post a Comment