Skip to main content

माझं गाव

  बोरकरांनी "माझा गाव" कवितेत लिहीलय,
        "जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले.
         काळोखात कुणीतरी ज्योत घेउन आलेले."
  आता माझे गाव खरंच असे राहिले आहे, नाही !
पण आपल्या मनात अजून तेच जूने आठवणीतले गाव तसेच आहे कारण आपले त्यावरचे प्रेम तसूभरही
कमी झालेले नाही.
   आपल्या वाटचालीत अशी असंख्य छोटीमोठी गावं आपल्याला भेटतच असतात, आपण पुढे निघून गेलो तरी या गावांबद्दल असेच कायम कृतज्ञ राहीले पाहिजे.
    गावं तशीच राहात नाहीत त्यांची शहरं होत जातात,ती विस्तारत जातात,त्यांच्या रस्त्यावरचे आपले ठसे पुसट होत जातात,तरीही आपण मात्र आठवणीतले ते गाव प्रेमाने जपले पाहिजे.ज्यांनी आपल्याला भरभरुन दिले.
    माणसं तरी कुठे वेगळी असतात,गावच ती, गजबजलेली. जी आठवणीत जपली पाहिजेत,ज्यांची आठवण जपली पाहिजे,कृतज्ञतेने त्यांच्यात कितीही बदल झाला तरी.
       पावसानी अंगणात थैमान मांडलेले
       कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले.

        कोपला होताच सूर्य डोईवरचा कधीचा
        कोणीतरी सावलीचे झाड होवून आलेले.
   
        सरली होती ऊब अंगातली कधीची
        कोणीतरी हळूवार मिठीमध्ये घेतलेले.

         पेटला होता अंगार सभोवताला द्वेषाचा
         कोणीतरी येवून मनावर फुंकर मारुन गेलेले.

         संपत नसतो ओलावा एकाच वेळी जगामधला
        कोणीतरी असतेच नेहमी देव म्हणून भेटलेले.
  

     ---- अभय बापट
०९/०५/२०२२

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४