राधे,
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, सावलीही आपली सोबत सोडायला लागली, नजरेला धुसर दिसायला लागले की समजावे,थांबायची वेळ झाली आहे, मग तो प्रवास कोणताही असू दे. अशावेळी उगाच सुर्याच्या शोधात ऊर फुटेस्तोवर धावणे नक्कीच शहाणपणाचे नाही.
काळोख दाटतो तो तुम्हाला एक पुर्ण नवा दिवस देण्यासाठीच.
अशा वेळी आपल्या आजूबाजूला असलेला निरांजनाच्या स्निग्ध उजेडला आपलेसे करावे, त्या शांत उजेडात शांत मनाने विचार करताना आपला मार्ग विचारपुर्वक निवडता येतो, जाणीवपूर्वक चुका टाळत मार्गक्रमण करता येते.
राधे,प्रेम ही एक सुंदर अनुभूती आहेच पण तो एक दिर्घ प्रवासही आहे. त्याच्या कणाकणावर आणि क्षणाक्षणावर अद्भुत सौंदर्याचा सडा पडलेला असतो,तो प्रवास पूर्ण करणाऱ्यांना नात्याचे वरदान लाभते पण प्रेमाला लक्ष्य ठरवणाऱ्यांच्या नशिबात येतो तो निव्वळ व्यवहार,अंतापर्यंत जावूनही अंतहीन.
राधे, प्रेमात व्यवहार असतोच, कारण प्रेमाला अनेक रंग, गंध असतात आणि ते वेगवेगळे जपावे लागतात. व्यवहार कोणाला चूकलाय राधे, मलाही नाही. प्रेमात व्यवहार क्षम्य आहे राधे, पण व्यवहार म्हणून प्रेम करणारे स्वत:शीच नव्हे तर समाजाच्या विश्वासाशी द्रोह करणारे असतात.
कोणत्याही प्रवासात योग्य ठिकाणी थांबा घेता येणे हेच यशस्वी प्रवासाचे गमक आहे. नाहीतर लवकर पोहोचूनही खुप काही हातातून निसटून जाते.
---- अभय बापट
Comments
Post a Comment