परवा काका म्हणाले " चालत रहा, चालत रहा, चालणाऱ्याला निसर्ग भेटतो, एकदा स्वत:ला अवकाशात बंदिस्त करुन टाकले की निसर्गसुक्त घरातच आळवत बसावे लागते.
स्वामींच्या भाषेत बोलायचे तर " एकदा बंदिस्त अवकाश स्विकारला की त्याला तुरुंग समजायचे की मानसिक उब देणारे देवालय हे आपल्या हातात असते."
अवकाश तरी कुठे निसर्गापासून वेगळा असतो, तो ही निसर्गाचाच एक अंश. तिथेही सुर्य असतोच,कधी दाहक तरी कधी उबदार, हवाहवासा वाटणारा, आत कुठला ऋतू जपायचा हे आपल्याच हातात असते.
तिथेही चंद्र असतो पौर्णिमेचा,शितल चांदणे देणारा.
तिथेही हवाहवासा वाटतो हिवाळ्यातला गारवा,सफरचंद पिकवणारा.
तिथेही इंद्रधनुष्य उमलून जाते, भरलेला मेघांच्या वर्षावा पाठोपाठ.
तिथेही असते वृक्षांची सावली, वेलींची प्रफुल्लता, फुलांचा सुगंध आणि कोवळ्या पालवीची कोमलता.
तिथेही असते मातीची सगुणता आणि पाण्याची झुळूझुळू वाहणारी निर्मलता.
फक्त तृप्त व्हायचे याच्या सानिध्यात, जवळचे सोडून बाहेरच्या निसर्गासाठी का कुठत बसायचे.
निसर्ग इथेही असतो आणि तिथेही, आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत,अभिन्न घटक निसर्गाचे. निसर्गाचा अंशावतार.
Comments
Post a Comment