Skip to main content

दु:ख

मने,
      प्रत्येक जखम बांधून ठेवायची नसते, काही जखमा एवढ्या साध्या असतात की मोकळी हवाच तिच्यावर मलमाचे काम करते.
      मने, दु:खाच्या गाठोड्यात स्वत:ला बांधून घेतल्याने दु:ख कमी होत नाही तर ते वाढतच जाते. आनंदी क्षणाची छोटीशी झुळूकही दु:खावर उतारा ठरु शकते.  
       प्रत्येक दु:खावरती पेनिसिलीन लावावे लागत नाही, कधी तुपाचे नाजूक बोट ही दुखणे कमी करते.
       मने, हाताला खुपणारे कुस कधीतरी निघतेच , कधी मुद्दाम काढून टाकवे लागते, कधी आपोआप कामाच्या ओघात निघून जाते,कधी आजीच्या मायेच्या हळूवार स्पर्शानेही निघते. ते चांदण्याचे हात आपल्या आजूबाजूला असतातच वेगवेगळ्या रुपात फक्त ते हात हातात घ्यावे लागतात.
        मने, दु:खाच्या ओघात का वहावत जावे, त्या प्रवाहात सुद्धा खंबीर रहावे दगडासारखे अविचल,दु:खाचा प्रवाह भेदत. बघ आनंदाचे कणकण वाहत येवून आजूबाजूला जमा होईल.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४