Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

ओंजळ

ओंजळीत पारिजात मन मोहरुन आले, जणू चैतन्य हातातून हृदयामध्ये विसावले

मराठी गौरव अभंग

मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ  घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२

अभंग प्रेमाचा

माझ्या कवित्वाचा अंश माझ्या वेदने मागचा दंश माझ्या शब्दांचा सारांश तुझ्यापायी. माझ्या आनंदाचे निधान माझ्या स्वप्नांचे विधान माझ्या समृद्धीचे गान तुझ्यापायी. माझ्या कल्पनेचा खेळ माझ्या अनुभवाचा मेळ भावनांचा कल्लोळ तुझ्यापायी. माझ्या कवितेतला भाव माझ्या शब्दांतील ठेव माझ्या कल्पनेतला जीव  तुझ्यापायी. माझ्या कवित्वाची धनी माझ्या हातातील झरणी स्फुरते माझ्या मनी तुझ्यापायी. २६/०२/२०२२

रे आयुष्या

पाऊसधारेत भिजायचे राहून गेले रे आयुष्या, प्रेम करायचे राहून गेले. रंगांनी भरला होतो मळवट फुलांचा रे आयुष्या, रंगात रंगून जायचे राहून गेले. सुगंधाने कोरले होते लेणे हवेमध्ये रे आयुष्या, स्वत: सुगंधी व्हायचे राहून गेले. आई नावाचे बिरुद मिरवले वेळोवेळी रे आयुष्या, कसे ते माऊली बनायचे राहून गेले. मी पण माझे सदा मिरवले पावलोपावली रे आयुष्या, दुसऱ्यांचा विचार करणे राहून गेले. २५/०२/२०२२

झाड आणि माणूस-नवकवीता

झाडं सगळं सहन करतात, बदललेल्या ऋतूं पासून, बदललेल्या माणसांपर्यंत घरटं सोडून जाणाऱ्या पक्षां पासून,  रस्ता हरवलेल्या पाखरांपर्यंत. सहन करतात म्हणजे दुखत नाही असं नाही, वाऱ्यावर डोलताना दिसतात म्हणजे रडत नाहीत असं नाही. पण आशेने सांभाळत बसतात,  खोलवर रुजलेल्या मुळांना  आणि  हिरवागार रंग घेतलेल्या पानांच्या तुऱ्यांना. आशा ऋतू पुन्हा वेळापत्रक सांभाळतील, पक्षी पुन्हा गाणी गातील,  पिल्लांना शिकवण्यासाठी फांद्यांचे झोके करतील. माणसही पुन्हा माणसासारखी वागतील,  भरभरुन खुडताना,कणभरतरी भुईला देतील. माणसंसुद्धा झाडांसारखीच  आशेचे पंख लावून उभी असतात आजकाल. हिरवळीच्या कोपऱ्यावरच्या ओलाव्याच्या शोधात, कोणी कृतज्ञतेने आणून रोवेल आठवणींचे बीज, ज्यातून फुलतील माणूसकीचे मळे, एकमेकांच्या दु:खाने होरपळणारे  आणि  आनंदाच्या तृणावर फुल होवून डोलणारे. २५/०२/२०२२

नवकवीता

मलाही कधीतरी तरुन जायचा होता, नव-काव्याचा अथांग, दुर्बोध, जीवघेणा सागर. छंद, वृत्त, यमक या जिवनरक्षक साधनांच्या सहाय्याशिवाय, फक्त विरामचिन्हांची वल्ही वापरुन. गद्याच्या धुक्यात दडलेल्या भावनांना  शोधायचे होते नवकवितेच्या रुपात. मलाही मिरवायचे होते  नवकवीचे बिरुद लावून  साहित्य शारदेच्या दरबारात  एक यशस्वी मानकरी म्हणून. २५/०२/२०२२

सहारा

अंधेरे में उजाला बनकर आए थे हम तिनके का सहारा लेकर आए थे हम। आप यु हीं सबसे जुदा हो बैठी दिल की उमंग बनकर आए थे हम।। २५/०२/२०२२

फार काही नको

फार काही मागत नाही कधीतरी बोलत जा, आनंद ठेव मनामध्ये दु:ख तरी सांगत जा. फार काही मागत नाही कधीतरी दिसत जा, नेहमी आली नाहीस तरी दिलखुलास हसत जा. फार काही मागत नाही कधीतरी स्मरत जा, तुटून गेले सर्व तरी आठवणी जपत जा. फार काही मागत नाही स्वत:ला जपत जा, माझ्यासाठी नाही तरी स्वत:साठी देवाकडे मागत जा. फार काही मागत नाही आठवणीत येत रहा, विसरलीस मला तरी  माझ्या मनाला उजळत जा. २४/०२/२०२२

एकदा असे व्हावे

एखादे गाणे असे गावे नभामध्ये भरुन रहावे, एकदा प्रेम असे करावे जिवन सारे सार्थ व्हावे. एकदा तरी असे बोलावे शब्द सारे सरुन जावे, एखादे वाक्य असे मांडावे कायमची ओळख बनावे. एखादे काव्य असे स्फुरावे अर्थपूर्ण गीत व्हावे, एखादी तान अशी घ्यावी ऐकणाऱ्याने तृप्त व्हावे. एकदा तरी असे वागावे समोरच्याने सुखी व्हावे एकदातरी असे जगावे कायमची स्मरणात उरावे.

तुझ्यासाठी...

तुझ्याचसाठी पसरली क्षितीजावरती लाली, तुझ्याचसाठी पांघरली निसर्गाने नव्हाळी. तुझ्याचसाठी आभाळी होते मेघांची दाटी, तुझ्याचसाठी धरणीमधुनी तृण जन्म घेती. तुझ्याचसाठी पहाटवेळी पक्षी गाणी गाती तुझ्याचसाठी झाडांवरती फुले फुलून येती. तुझ्याचसाठी सुगंधाची वाऱ्याला मिठी, तुझ्याचसाठी निसर्गातून ऋतू अवतरती.

एकाकी....

एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे. कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे. दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे. स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे. आपले आपले करता हात रिक्त होती दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे. आनंदाने जगताना जपले ही पाहिजे जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे. १९/०२/२०२२

कोण ?

दिवसरात्रीचे रहाटगाडगे कोण फिरत ठेवते, आपल्यासाठी जीवनसरिता कोण घेवून येते. सुखदु:खाचे गीत त्यातून  अविरत उमटत राहाते, आयुष्याच्या क्षितीजावरती कोण पहाट करते. तृषार्ताच्या ओंजळीमध्ये कोण अमृत देते, तृप्त करुन आयुष्याला कोण सार्थकता देते. असते थोडे,नसते थोडे भाव भक्तीचे देणे, त्याच्या मुरलीमधूनी जिवन गाणे स्फुरते.

सारे तुझेच

सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून  स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे. १८/०२/२०२२

येवून गेली ती

वाऱ्याच्या झुळके सम येवून गेली ती रातराणीचा सुगंध मनात सोडून गेली ती. धुंद पावसाच्या खुणा इथे मांडून गेली ती अस्तित्वाच्या खुणा इथे उमटवून गेली ती. नव्हता केला पुन्हा भेटीचा वायदा कोणी तरी न पुसणारी अक्षरे कोरुन गेली ती. नव्हता फुलांचा बहर उमललेला जरी इथे अत्तरा सारखी सुगंधी दरवळून गेली ती . कळी सारखी उमलली, आणी फुलून गेली फुला सारखी वाऱ्यावर डोलून गेली ती. जे कधीच रुजून येणार नाही असे निसत्व असे कोरडे शुष्क बी मनात पेरुन गेली ती ऋतू सारखे उधळले सभोवताली रंग ऋतू सारखीच चार दिवस राहून गेली ती. १७/०२/२०२२

आत्मरुप

आत्म्याचा आत्म्याशी होतसे संग, आनंदात मग्न आत्माराम. सुखाच्या शोधात साधनांचे प्रस्थ, तेथे मिळतात आत्ममग्न. नको रे मना साधनांपाठी धावू उगाच कवटाळू आत्मक्लेश. प्रेम रुप देव प्रेम रुप ज्ञान, जाणून तू पाव आत्मज्ञान.

सोबत

अजूनही या घरट्यात अभंग आहेत प्रीतीचे घडे अजूनही अंगणात पडतात प्राजक्ताचे सडे. अजूनही ऋतू वसंत उमलतो माझ्या दारी अजूनही तुझ्याचसाठी चातक घेतसे भरारी. अजूनही रोज रात्री चांदण्याची पायवाट अजूनही उजळते आठवणीतील तुझी बट. अजूनही श्रावणात भरुन येती मधुघट अजूनही तुझ्याच साठी जागी राहते पहाट. अजूनही तृणांकरांना सय तुझ्या स्पर्शाची अजूनही आठवण ओली सोबतच्या वर्षाची.
पुन्हा एकदा आसवांना एक संधी देवू या मनातल्या शब्दांना डोळ्यांमध्ये वाचू या

आपले काही राहीले नाही....

कुठे काही बोलावे असे ठिकाण राहीले नाही कुठे जरा थांबावे असे मकाण राहीले नाही. आयुष्य हा अड्डा झाला राजकारणाचा  माणसाला किंमत असेल दुकान राहीले नाही. सांगोवांगीच्या गोष्टींनी भरुन गेला ग्रंथ आपला सत्य परिस्थिती ऐकणारे कान राहीले नाही. भरुन गेली कोठारे द्वेषाच्या लागवडीने कोणी आता पुर्वीसारखे सुजाण राहीले नाही. सापडले आहे जहाज भयंकराच्या वादळात योग्य मार्गावर ठेवणारे सुकाण राहीले नाही. आदर्शाची उडवणे खिल्ली नेहमीचेच झाले. सर्वांनाच प्रेरणादायी असा प्रमाण राहीले नाही. प्रत्येकाला हवी असते शांतीब्रह्माची ठेव नम्रपणे स्तब्ध व्हावे असे प्रतिष्ठान राहीले नाही.

येणार असशील तर.....

येणार असशील तर नकळत ये चांदण्याचे पाऊल घेवून ये, उशाशी ठेवलेल्या बकुळीचा धुंद सुगंध होवून ये. येणार असशील तर पावसाची संतत धारा होवून ये बटांवरुन ओघळणारा छोटासा तृप्त थेंब होवून ये. येणार असशील तर वाऱ्याची थंड झुळूक होवून ये गोड शिरशिरी अंगावरती मनावर उब पांघरुन ये. येणार असशील तर सूर्याचा नवीन किरण होवून ये अस्तित्वाला उजळत उजळत नव जीवन घेवून ये. येणार असशील तर धुक्याची ओली चादर होवून ये कुंद हवेला धुंद करत धुंद आठवणी घेवून ये. येणार असशील तर सुखाचे कोवळे पाऊल होवून ये,  सौख्यदायी जगण्या मधले सारे समाधान घेवू ये.

लताssss

   लहानपणी फुले वेचीता हे लता मंगेशकर यांनी स्वत:बद्दल लिहीलेले पुस्तक वाचलेले आठवतेय, ते पुन्हा एकदा वाचायला हवे.    मोगरा फुलला सारखे अप्रतिम संकलन त्यांच्याबद्दलच्या लेखांचे उपलब्ध आहे.     एवढं सगळं असताना आपण काही किडूकमिडूक लिहीणं म्हणजे," समोर असलेल्या अमृतात चिमूटभर साखर टाकून ते स्वत:चे म्हणून मिरवणे."

सवय की व्यसन

व्यंकटेश माडगुळकरांनी एका ठिकाणी अस्वलाबद्दल लिहीले आहे. अस्वलाला बहावाच्या शेंगा अत्यंत प्रिय,पण बहावा सारक असल्यामुळे या प्रिय गोष्टींमुळेच अप्रिय वेदनांना त्याला सामोरे जावे लागते, "आम्ही जातो आमुच्या गावा" सिनेमातील मधु आपटेंप्रमाणेच.           मग ते अस्वल निश्चय करते,बहावाकडे बघायचेही नाही,दोन-चार दिवस सरतात,निश्चय डळमळीत होवू लागतो,बहावाचे झाड हिरव्यागार शेंगा हालवत साद घालतच असते," हवास तू, हवास मज तू, हवास तू "           "आपला काय आपल्या मनावर ताबा नाही "? असा विचार करत "एकच शेंग खाऊ" असे मनाला बजावत अस्वल झाडाजवळ जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या......           आपले पण त्या गोष्टीतला बहावा आणि अस्वला सारखेच होते, फेसबुक म्हणजे बहावाचे झाडे, सुंदर पोस्टनी, फोटोंनी सजलेले,हिरव्यागार वेड लावणाऱ्या शेंगा हात हलवून साद घालत असतात.           आपला निश्चय थोडावेळ टिकतो, आपण पुन्हा पुन्हा "मला व्यसन नाही लागलय,पाच मिनिटं तर बघणार" असे मनाला बजावत इथे येतो,अडकून पडतो    ...

पुन्हा पुन्हा

पुन्हा पुन्हा जोडत राहतो नशीबाला दोन हात एवढी कसली ओढ आयुष्याची. पुन्हा पुन्हा कशी पाहतो नवी स्वप्न डोळी  उठून परत सकाळी  कासाविशी. पुन्हा पुन्हा ओढून नेते अव्यक्ताची शिदोरी एवढी कसली भुक सोबतीची. पुन्हा पुन्हा वाटत राहते होईल सारे ठिक एवढा कसा विश्वास नशीबावर.

शेवटपर्यंत

शेवटपर्यंत जगाता आले कारण शेवटपर्यंत वेड्यासारखे वागता आले, जवळ काही नसताना सुद्धा कणाकणाने वाटता आले. ०२/०२/२०२२

आता......

बंद केले सडा सारवण अंगणाला आता माझे ही मन दु:खाला सरावले आता. नकोत आता वरवरचे उपचार कोणतेही तिच्या हसण्याला औषध मानणे सोडले आता. मी एकटाच लढणार दोघांच्या नशिबाशी  अंधाराचे वरदान ही माझ्याच चंद्राने दिले आता. माहीती आहे ती होती भेट शेवटची आपली मी माझा पत्ता आयुष्यालाही देणे सोडले आता. होता हातात हात जेव्हा डोळे फितूर झाले सांगण्यासाठी शब्द उसने घ्यावे लागले आता. ०१/०२/२०२२