Skip to main content

सवय की व्यसन

व्यंकटेश माडगुळकरांनी एका ठिकाणी अस्वलाबद्दल लिहीले आहे. अस्वलाला बहावाच्या शेंगा अत्यंत प्रिय,पण बहावा सारक असल्यामुळे या प्रिय गोष्टींमुळेच अप्रिय वेदनांना त्याला सामोरे जावे लागते, "आम्ही जातो आमुच्या गावा" सिनेमातील मधु आपटेंप्रमाणेच.
          मग ते अस्वल निश्चय करते,बहावाकडे बघायचेही नाही,दोन-चार दिवस सरतात,निश्चय डळमळीत होवू लागतो,बहावाचे झाड हिरव्यागार शेंगा हालवत साद घालतच असते," हवास तू, हवास मज तू, हवास तू "
          "आपला काय आपल्या मनावर ताबा नाही "? असा विचार करत "एकच शेंग खाऊ" असे मनाला बजावत अस्वल झाडाजवळ जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या......
          आपले पण त्या गोष्टीतला बहावा आणि अस्वला सारखेच होते, फेसबुक म्हणजे बहावाचे झाडे, सुंदर पोस्टनी, फोटोंनी सजलेले,हिरव्यागार वेड लावणाऱ्या शेंगा हात हलवून साद घालत असतात.
          आपला निश्चय थोडावेळ टिकतो, आपण पुन्हा पुन्हा "मला व्यसन नाही लागलय,पाच मिनिटं तर बघणार" असे मनाला बजावत इथे येतो,अडकून पडतो 
          आणि, पुन्हा येरे माझ्या मागल्या.
          तोच आनंद,तोच राग-द्वेष, तीच ओढ, अगदी गुंतून पडतो पुन्हा नव्याने निश्चय करे पर्यंत.
    

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४