Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

वेगळी

ती स्वप्न वेगळी होती त्या रात्री वेगळ्या होत्या, तुझ्या माझ्या गप्पांच्या मैफिली वेगळ्या होत्या. ते गीत वेगळे होते ते सूर वेगळे होते, तुझ्या माझ्या मौनातले हुंकार वेगळे होते. तो स्पर्श वेगळा होता तो भाव वेगळा होता, तुझ्या माझ्या मनातला ओल वेगळा होता. ती भेट वेगळी होती ती ओढ वेगळी होती तुझ्या माझ्या आयुष्यातील ती सोबत वेगळी होती. ती हाक वेगळी होती ती नाराजी वेगळी होती तुझ्या माझ्या अंतरातील ती अपूर्णता वेगळी होती. २८/०१/२०२२

नियती

मेघांच्या डोळ्यांतही झड दाटून येते जेव्हा आठवण पाण्याची मनी दाटून येते लवलवणारे पाते तेव्हा आतून सुकून जाते जेव्हा धरती त्याचे अन्न आतून तोडून घेते. फुल ही त्याचे धन वाऱ्या हाती सोपवते जेव्हा झाड फुलाच काम संपवून टाकते. प्रत्येक गोष्ट नाही घडत मनासारखी नेहमी मन तेव्हा सांधा बदलून मार्ग जुळवून टाकते, प्रत्येकाचे कार्य असते नशीबाने नेमलेले नियती नावाचे कोडे गुंते सोडवून टाकते.

मुक्ती मिळू दे देवा

सजेतून तुझ्या आता मुक्ती मिळू दे आठवणीतूनच तुझ्या ही शक्ती मिळू दे. नको द्वेष माझ्या मनी जराही रूजे दे तुझ्या प्रेमातूनच जराशी भक्ती मिळू दे. कसे वागावे जगात आता तरी कळू दे तुझ्या जगण्यातून ही युक्ती कळू दे. नको आनंद आणि दु:ख उरात राहू दे आता नव्याने समंजस व्यक्ती बनू दे. नको देवा आता हे नाटकी मुखवटे तुझ्या पाऊली अभंग मुक्त मिळू दे.

संगत

पावसाच्या पावलांंनी  तू अंगणात यावे, पुन्हा एकदा वाटते शब्दात भिजून चिंब व्हावे. वाऱ्याची झुळुक होवून तू घरामध्ये शिरावे, तुझ्या सुगंधाने घराचे देवघर व्हावे. थंडगार वारा बनून तू ग्रीष्माला लोभवावे, माझ्या मनाला सोबत घेवून तू दूर देशी जावे. कोवळे ऊन बनून तू माझ्या देहाला लपेटावे सोनेरी तुझ्या किरणांसोबत मी सोनेरी पहाट व्हावे. निसर्गाचे रुप बनून माझ्या गावातच रमावे माझ्या गावानेच मग स्वर्गाचे रूप घ्यावे.

संपवून टाकूया

केव्हा तरी एकदा परत भेटूया एकमेकांच्या आठवणी परत करुया. नकोच आता घरावरले पोकळ वासे खोलवर घातलेला पाया तोडून टाकूया. फुललेले वसंत झेलले ज्या झाडाखाली ते झाडच आता एकदा उखडून फेकूया. बघितली होती किती स्वप्न चांदण्या राती ते चांदणेच आता मनातून खुडून टाकूया. चाललो ज्या पायवाटे वरुन आनंदाने ती पायवाट आता विसरुन जावूया. नसते सुटत गणित आयुष्याचे प्रतिक वेळी मांडलेला जमा खर्च पुसून टाकूया. असतात आवडणारे रंग प्रत्येकाचे वेगळे एकमेकांत मिसळण्या आधीच धुवून टाकूया. लिहीली प्रत्येक कविता तुझ्या प्रेमाखातर ती वही एकदा तुझ्या साक्षीने जाळून टाकूया.

चारोळी- बेत

मना प्रमाणे जगण्याचे किती बेत होते, मी शोधत आत होतो मन दुसऱ्याच्या ताब्यात होते.      *सुप्रभात*

देवा रे

देवा तुझ्या डोईवर माझ्या स्वप्नांचे ओझे आणि तुझा उंबरा माझ्या पायाने गजबजे. देवा तुझ्या पाठीमागे माझ्या मागण्यांचे लोंढे आणि तुझी पायवाट सोडून मी मार्ग शोधे. देवा तुला नावाला माझ्या नावाचा रे बट्टा आणि तुझ्या देवळात लागे मागण्यांचा सट्टा देवा माझ्या आर्जवाने तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आणि माझ्या सुकृतांचा शेवटी माझा मीच धनी.

अशीच....

अशीच होती कविता लिहीली अशीच होती शब्द वेंधळी, अशीच होती तुही समोरी अशीच होती वेळ हळवी. अशीच होती पहाटवेळ अशीच होती थंडी गुलाबी अशीच होती उब तनूवर अशीच होती लाज लाजरी. अशीच होती मान फिरवली अशीच लाली गोबऱ्या गाली अशीच होता स्पर्श आर्जवी अशीच होती फुले उमलली. असेच होते मौन आपले असेच होते हरवून जाणे असेच होते अंतरावर असेच होते तुझे नी माझे असेच होते तुटत जाणे असेच होते अबोल बघणे असेच होते शोधत राहणे असेच होते जगत जाणे.

संपून जाणे

फुललो मी नेहमीच जेथे निर्माल्य होवून गेलो देवा तुझ्या डोईवरचा भार मातीमध्ये मिसळून गेलो. सुगंधाची लयलूट केली देव्हाराही सजवून गेलो, तुझ्या पासून तुटताना भुईला सुगंध वाटून गेलो. विझणाऱ्या वातीसारखा हवेमध्ये विरुन गेलो, देह सार्थकी होता होता तुझ्या नावे उरुन गेलो. फुलांचही माणसा सारखे आयुष्य कोणासाठी संपते, दोन दिसांनी नवीन फुलते जूने माती होवून जाते

याला काही अर्थ नाही

संपल्यावर सारे काही कोणी हात पुढे करते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. धावून थकलेल्या पावलांना कोणी नवा मार्ग दाखवते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. स्वप्न संपल्या डोळ्यांशी जेव्हा कोणी डोळे मिळवते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. विरुन गेलेल्या आठवणींना कोणी दुरून साद घालते तेव्हा लक्षात येते  याला काही अर्थ नाही. निर्मल्य झालेल्या फुलाला कोणी डोई माळू पाहते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. वठलेल्या कल्पवक्षा कोणी नव्याने जगवू पाहते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. माती झालेल्या माणसाला कोणी पुन्हा पुन्हा स्मरते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही.

मकरसंक्रांत

काकू, तिळगुळ घ्या गोड बोला. मला माहितीय मेल्या, भयंकरणीकडे आधी गेला असशील नंतर माझी मेलीची आठवण काढली असशील. आज्जीच्या परवानगीशिवाय मी कधी काही करतो का काकू ? तिळगुळ पण तिच्या सल्ल्यानेच केला असशील? हो तर,गुळ चिरायला पण आधी तिचाच सल्ला घेतला . तुला पाडायला म्हणायचं आहे का?. जिवंत रहायचयं काकू मला पुढच्या संक्रांतीपर्यंत. माझ्या मनात असलेल्या छोट्या छोट्या तिळांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी गोड शब्दांचा गुळ घालायचा प्रयत्न केलाय काकू,आपले गोड शब्दसुद्धा काहीजणांना तिरकस टोमणे वाटतात🥲. आधी बोलत जावं ! बाबा,समोरच्याला गुड, कडू वाटेल हे त्यांच्या त्या त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि हो, आपण सिग्धपणे माणसं जोडत गोडवा जपायचे काम करत रहायचे, आपल्या हातात तर तेवढेच असते. नमस्कार करतो काकू. बरं वाटलं रे बोलून, नाहीतर "२०० मेसेज पाठवण्यापेक्षा दोन गोड शब्द बोलून बघा" हे ही मेसेजमध्येच सांगायचे दिवस आलेयत हो.             दोन गोड शब्द  कानावर यावे, दोन गोड क्षण मनात उरावे तोच हा दिन सुगीचा मकर संक्रामणाचा मनातून मनामध्ये रुजत जावयाचा. माझ्या कणाकणाने जोड...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

           दु:ख आपले मनीमनीचे             कुपीमध्ये लपवून यावे,            तिळगुळ घेवून भेटेल त्याला            गोड शब्द वाटून द्यावे.                          असे सरावे दिवस सारे             असेच सगळे वर्ष सरावे,              संक्रांतीच्या एक दिनाचे              महत्व सारे सरुन जावे.                       मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कविता जिवनाची

अशीच होती कविता लिहीली अशीच होती शब्द वेंधळी, अशीच होती तुही समोरी अशीच होती वेळ हळवी. अशीच होती पहाटवेळ अशीच होती थंडी गुलाबी अशीच होती उब तनूवर अशीच होती लाज लाजरी. अशीच होती मान फिरवली अशीच होती गोबऱ्या गाली अशीच होता स्पर्श आर्जवी अशीच होती फुले उमलली. असेच होते मौन आपले असेच होते हरवून जाणे असेच होते अंतरावर असेच होते तुझे नी माझे असेच होते तुटत जाणे असेच होते अबोल बघणे असेच होते शोधत राहणे असेच होते जगत जाणे.

तुझेच......

आठवणीतले माणिक मोती गळून गेले, तुझेच होते. डोळ्यामधले स्वप्न सुनहरे काजळ डोही,तुझेच होते. रंगबिरंगी दिवस तेही फुलपाखरी तुझे होते, हातामध्ये शिल्लक उरले रंग सगळे तुझेच होते. स्निग्ध उबेचे स्पर्श सावळे रेंगाळणारे तुझेच होते. उंबऱ्यावरला पायरव ते चाहूल भरले तुझेच होते. गंध वेगळे हवेत भरले वाऱ्यावरती तुझेच होते. आठवणीतच उरले सारे विरुन गेले,तुझेच होते. पाठी मागे शिल्लक आहे मी पण माझे,तुझेच होते. संपून गेले तरी ही सारे नाव त्यावरी तुझेच होते.

माझ्या कवितेचे भाग्य

माझ्या कवितेचे वेड माझ्या उरी राहू दे, माझ्या शब्दांचे कोड माझे मला सुटू दे. माझ्या गीताचा अर्थ कोणातरी उमगू दे, त्याच्या मुखातून ते स्वर होवून उमटू दे. माझ्या आर्ततेला नवे कोंदण लाभू दे कोणीतरी व्यथांचेही थोडा हिशेब मांडू दे. माझ्या काव्याची सुमने कोणा पायी पडू दे उचलून त्याने त्यांना उराउरी भेटू दे. माझ्या कविता अभंग तुझ्या डोही राहू दे नाही देवत्वाचा स्पर्श तरी वचनी उरु दे. माझ्या कवितेला गोडी अमृतासम लाभू दे, देवा तुझ्या कौतुकात माझे कवित्व संपू दे.  

कविता म्हणजे

शब्दांचा खेळ असतो आयुष्याचा मेळ असतो, कविता म्हणजे तरी काय भावनांचा कल्लोळ असतो. स्वप्नांचे प्रगट होणे आठवणींचे दाखले देणे, कविता म्हणजे तरी काय विचारांचे व्यक्त होणे. नात्यांचा मान असणे जगण्याचे भान असणे, कविता म्हणजे तरी काय जीवनाचे गाणे गाणे. सौख्याचे वाटणे असते आनंदाचे वेचणे असते, कविता म्हणजे तरी काय एकमेकांशी जोडणे असते.

साधेसुधे

साधीसुधी माणसं माझ्या कवितेचा पाया, साध्यासुध्या माणसांची साधीसुधी माया. साध्यासुध्या स्वप्नामधले साधसुधे गाव, साध्यासुध्या माणसांच्या मनाचा ठाव. साध्यासुध्या जीवनातील साधेसुधे कर्म, साध्यासुध्या माणसांच्या जगण्याचे मर्म. साध्यासुध्या जीवनाची साधीसुधी कथा, साध्यासुध्या माणसांच्या जीवनाची गाथा. साधेसुधे येणे आणि साधेसुधे जाणे, साध्यासुध्या आठवणींचे कणभर उरणे.

लळा जिव्हाळा

मला जो लागला तुझा लळा आहे सर्व दुनियेचा त्यावर पहारा आहे. सावली बघ गोळा झाली झाडाखाली  पांथस्थांचा जणू तो शेवटचा आसरा आहे. नभाला आस लागली मातीला भेटण्याची येतो तिच्याही अंगावर शहारा आहे. तिथे पलिकडे भेटते क्षितीज धरतीला त्याच्याही स्वप्नपूर्तीचा तोच सहारा आहे. असेच असतात रंग दुनियेचे झाकलेले इथे प्रत्येकजण आतून आवारा आहे.

आत्मपरीक्षण

           इतके सोपे असतं का कोणाला वजा करणे इतके सोपे डोळ्यातले स्वप्न पुसून टाकणे.            माणसांकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहीजे, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, ना मुलगा म्हणून,ना पालक म्हणून,ना साथिदार-जोडीदार म्हणून.             तो चुकत असतो,घडत असतो,बिघडतही असतो. त्याला समजून घेता आले पाहीजे, आधार देता आला पाहिजे.सावरता आलं पाहिजे.            त्याच्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करण्याआधी आपल्या आत डोकवता आलं पाहीजे.            स्वत:च्या मनाला जपण्याआधी दुसऱ्याचे मन समजून घेता आलं पाहिजे.             अलिप्ततेचा बुरखा पांघरता पा़ंघरता आपण रुक्षतेकडे तर वाटचाल करत नाही आहोत, हे डोळसपणे बघता आले पाहिजे.

चाहूल

तुझी चाहूल लागावा मन व्याकूळ व्हावे तुझ्या पाऊलखुणांवरुन मन मागे मागे जावे          असे हल्ली नेहमीच का व्हावे ?

ऋतू

ऋतू पांघरुन घेताना सृष्टी बदलत असते, पुन्हा बहरुन येण्यासाठी आधी रिक्त होवून जाते.

वसंत आपला स्वत:चा

फुलपाखराच्या आयुष्यात वसंत एकदाच येतो पण कोशातून बाहेर येतानाच फुलांचे रंग पंखांवर देतो. माणसांच्या आयुष्यातही वसंत एकदाच येतो पण वेदनेच्या कोशातून रंगीत शब्दांना जन्म देतो.

मैत्री फेसबुक शाळेतील

          दोन दिवस आपल्या फ्रेंडलिस्ट बद्दल लिहीलेले दिसतेय, सगळीच गंमतीदार निरिक्षण. ते वाचून मला एका जपानी हायकूचे मराठी चारोळी रुपांतर आठवले.        आपण दोघे गप्पा मारु        ये माझ्या जवळी        तु ही वेडा, मी ही वेडा        ही वेड्यांची शाळा.                        मला तर ही वेड्यांची शाळाच वाटते, ना.घ.देशपांडे यांना एका कवितेत," सकाळचा उगवतीचा सूर्य लालबुंद बर्फाच्या थंडगार गोळ्यासारखा वाटतो, माणसांकडे बघता बघता तो तप्त गोळा होवून तो माथ्यावर येतो."           "त्यांना ते बघून शाळात जाणारी मुलं डोळ्यासमोर येतात, शाळेत जाणारी मुलं अज्ञाधारक,शांत, समजूतदार असतात पण शाळेत पोचली की बरोबरीच्या मुलांसोबत वांडपणा करतात".             तसेच इथेही, या वर्गात येताना बहुतेक सर्वच जण समंजस, मनमिळाऊ असतात पण इथे आल्यावर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागली जातात.     ...