आठवतंय तुला, तुझ्या घरुन बाहेर पडताना,जिन्यात तू बोलण्यासाठी वळलीस,तुझ्या केसांचा मऊ,मुलायम,नाजूक स्पर्श माझ्या गालावर रेंगाळून गेला. मृदगंध हा माझा सर्वात जास्त आवडणारा गंध पण त्या क्षणी तुझ्या केसांच्या सुगंधाने क्षण भारुन टाकला तो आजपर्यंत मनात भरुन राहीलाय. हा सुगंध आयुष्यभरासाठी जपण्याची धडपड चालू असतानाच हात सुटून गेला कायमसाठी. पाऊस येतो नव्याने दरवर्षी, मृदगंधाला घेवून येतो, पण तू ? एका वळवाच्या पावसाने कायमचा दुरावलीस, पाऊस जसा दुरावतो आणि जमीनीला शुष्क,ओसाड बनवून जातो तशीच,तुही वैराण वाळवंट बनवून गेलीस. जणू ते ओघळलेले अश्रू शेवटची सही होती आपल्या नात्याच्या कागदावरची. तू नाही पण त्या सुगंधाने मात्र वचन पाळले आहे साथ करण्याचे, त्या सुगंधाला अमरतत्वाचे वरदान मिळाले आहे जणू, मनाच्या कुपीत दरवरळत आहे,तो शेवटपर्यंत तसाच राहील. शेवटपर्यंत........ ---- अभय बापट २८/०३/२०२३