चालावे की उभे रहावे हा एकच सवाल आहे.
ह्या संभ्रमाच्या वाटेवर तापलेल्या हवेवर हेलकावत तुटलेले पान होऊन भिरभिरावे निःसंगपणे की टाकून द्यावे अंग तप्त भुमीवर ?
आणि करावा शेवट अस्तित्वाचा मनातल्या...?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
एकाकीपणाचे हलाहल भरुन घ्यावे उरामध्ये…
की नंतर असणाऱ्या जिवंतपणाला नसावा स्पर्श अमृताचा कधीही..
पण मग..
पण मग त्या
त्या अस्तित्वाला ही ग्रहण लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या लोकांच्या अनोळखी जंगालात प्रवेश करण्याचा,
धीर होत नाही म्हणुन आम्ही जपत रहतो जुने
आपलेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
उपेक्षांचे प्रहार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या मी पणाचा अंत..
आणि अखेर शरण जातो खालच्या मानेन भुतकाळाच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना प्रेम दिले ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला प्रेम दिले तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या आठवणींचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही कोणाच्या दारावर डोक आदळायच? कोणाच्या दारा ?
कोणाच्या ? कोणाच्या???
मामा वरेरकारांसारख्या प्रख्यात नाटककार,जगन्मित्र,कोटीभास्कर , खासदार, ज्यांनी अजरामर नाटके रंगभूमीला दिली, शरच्चंद्रांच्या सर्व कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला. तमसगीरांसारख्या उपक्षितांना तंबू आणि यात्रेतून मुख्य धारेमध्ये स्थान मिळवून दिले. अशा मामांना आपली जाणीवपूर्वक उपेक्षा केली जातेय अशा संशयाने हवालदिल करुन टाकले,तिथे सामान्यांची काय कथा !
पण मग अशा वेळी आठवतो तो साहित्यिक रवींद्र पिंगे यांचे वडील रामभाऊ पिंगे यांनी आपल्या मुलाला केलेले मार्गदर्शन.
" दुसऱ्याला पारितोषिके मिळतात आणि तुला नाही याचे वाईट वाटून घेवू नको. त्यांच्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही,तुझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही. प्रत्येकाची शक्तिस्थाने वेगवेगळी असतात. त्यांना पारितोषिक मिळाले म्हणजे ते जगावेगळे ठरत नाहीत. ईश्वराची कृपादृष्टी असणे महत्वाची, ती तुझ्यावर आहे,तू आनंदाने जे लिहीतोयस ते लोक तेवढ्याच आनंदाने वाचतायत,आणखीन काय हवे ?"
Comments
Post a Comment